RCB vs MI : तिलक-नमनची निर्णायक खेळी, आरसीबीसमोर 167 धावांचं आव्हान, मुंबई जिंकणार?
Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians, 1st Innings Highlights : मुंबई इंडियन्सला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात नमन धीर आणि तिलक वर्मा या जोडीने प्रमुख योगदान दिलं. जाणून घ्या दोघांनी किती धावा जोडल्या.

तिलक वर्मा आणि नमन धीर या दोघांचा अपवाद वगळता मुंबई इंडियन्सच्या प्रमुख फलंदाजांनी पुन्हा एकदा घोर निराशा केली आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 54 व्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली आहे. मुंबईने आरसीबीसमोर 167 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 166 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईसाठी तिलक वर्मा आणि नमन धीर या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान देता आलं. तर इतर प्रमुख फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यात भुवनेश्वर कुमार याने प्रमुख भूमिका बजावली. त्यामुळे आता आरसीबी विजयी आव्हान पूर्ण करत प्लेऑफचा दावा आणखी मजबूत करणार की मुंबई गेल्या पराभवाची परतफेड करणार? याचं उत्तर हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
