IPL 2026: ऋषभ पंतचं कर्णधारपद गेलं, लखनौ सुपर जायंट्सने जाहीरपणे सांगितलं की…
आयपीएल स्पर्धेत शेवटचे दोन सामने शिल्लक असताना इतर फ्रेंचायझींमध्ये ऑपरेशन सुरू झालं आहे. लखनौ सुपर जायंट्सने सर्वात आधी साफसफाई सुरू केली आहे. कर्णधार ऋषभ पंतला पहिला धक्का बसला आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी निराशाजनक राहिली. या स्पर्धेत फक्त चार सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं. यासह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सचं सर्व गणितं चुकली असं म्हणावं लागेल. ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्स संघाची हाराकिरी झाली. ऋषभ पंतने या स्पर्धेतील 14 सामन्यात 28.3 च्या सरासरीने 312 धावा केल्या. या पर्वात त्याने फक्त एक अर्धशतक ठोकलं आणि त्याचा स्ट्राईक रेटही 140 पेक्षा कमी होता. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वीच ऋषभ पंतला कर्णधारपदावरून काढल्याची घोषणा केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती आहे. आता ऋषभ पंत फ्रेंचायझीसोबत असणार की नाही याबाबत अस्पष्टता आहे.
लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर पोस्ट केली की, “लखनौ सुपर जायंट्स औपचारिकपणे जाहीर करते की ऋषभ पंतने फ्रँचायझीचे कर्णधारपद सोडण्याची विनंती केली आहे. फ्रँचायझीने त्याची विनंती तात्काळ प्रभावाने स्वीकारली आहे. एलएसजी व्यवस्थापन कर्णधार म्हणून ऋषभ पंतच्या योगदानाची प्रशंसा करते आणि त्याच्या नेतृत्वासाठी व संघाप्रती असलेल्या समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.”
Official announcement. pic.twitter.com/7WeOwpkDr6
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 29, 2026
लखनौ सुपर जायंट्सचे क्रिकेट संचालक टॉम मूडी सांगितलं की, “ऋषभने या संदर्भात फ्रँचायझीशी संपर्क साधला आणि आम्ही आदराने त्याची विनंती स्वीकारली आहे. असे निर्णय घेणे कधीच सोपे नसते. कर्णधार म्हणून ऋषभने या ड्रेसिंग रूमसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. आता आमचे लक्ष संघाची एकत्रितपणे पुनर्बांधणी आणि पुनर्रचना करून सर्वोत्तम दर्जा गाठण्यावर आहे.”
ऋषभ पंतला मेगा लिलावात लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रूपयांची बोली लावून संघात घेतलं होतं. तसेच त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा टाकली होती. मागच्या पर्वातही संघाची कामगिरी काही विशेष राहिली नाही. यंदा काही तरी वेगळं करेल असं वाटलं होतं. पण यंदाच्या पर्वातही तशीच कामगिरी राहिली. त्यामुळे 27 कोटींच्या या खेळाडूला संघ रिलीज करणार का? असा प्रश्न आहे. कारण संघाची पुर्नबांधणी करायची पर्समध्ये पैसे असणं आवश्यक आहे.