T20 Mumbai League : स्पर्धेच्या चौथ्या मोसमाची घोषणा, हिटमॅन रोहितचा खेळाडूंना कानमंत्र, काय म्हणाला?
T20 Mumbai League 2026 : एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनद्वारे टी 20 मुंबई लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमाची घोषणा करण्यात आली. यावेळेस एमसीए पदाधिकारी उपस्थित होते.

क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. या 19 व्या मोसमातील पहिल्या टप्प्याला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 10 संघांमध्ये 16 दिवस 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. क्रिकेट चाहत्यांमध्ये या पर्वासाठी उत्सूकता पाहायला मिळत आहे. अशात आता मुंबई क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएकडून बहुप्रतिक्षित T20 मुंबई लीगच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेतील चौथ्या पर्वाच्या घोषणेवेळेस टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा, एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड आणि आशिष शेलार हे उपस्थित होते. या दरम्यान रोहित शर्मा याने टीम इंडियाच्या कामगिरीचं कौतुक केलं. सोबतच खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन संधी सोनं करावं, असं रोहितने म्हटलं.तसेच रोहितने आपल्या क्रिकेटबाबतच्या काही आठवणींना उजाळा दिला.
“टीम इंडियाच्या कामगिरीचा अभिमान”
मेहनतच टीम इंडियाच्या यशाचं मुख्य कारण आहे. खेळाडू मेहनत घेतायत त्यामुळेच भारतीय संघ यशस्वी ठरतोय. भारतीय संघाची कामगिरी ज्या पद्धतीने सुरु आहे, तसेच महिला क्रिकेटपटू कामगिरी करत आहेत ते पाहून त्यांचा अभिमान आहे”, असं रोहितने म्हटलं. तसेच “भारतीय महिला आणि पुरुष संघाला जे यश मिळतंय ते असंच सुरु राहिल”, असा विश्वास रोहितने यावेळेस व्यक्त केला.
“वयापेक्षा मेहनत महत्त्वाची”
रोहितने खेळात वयापेक्षा मेहनत महत्त्वाची असल्याचं म्हटलं. “खेळात वय महत्वाचं नसून मेहनत महत्वाची आहे. मुंबईकर खेळाडू कठोर मेहनत घेतात, म्हणून त्यांना यश मिळतं”, असं रोहितने स्पष्टपणे म्हटलं.
एमसीए आणि ग्राउंड स्टाफला सर्व श्रेय
आयपीएल आणि मुंबई लीग या स्पर्धामुळे खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. त्यामुळे खेळाडू तयार होत आहेत. नवीन दमाचे खेळाडू तयार होण्याचं श्रेय हे एमसीए आणि ग्राउंड स्टाफच आहे” असं म्हणत रोहितने एमसीए आणि ग्राउंड स्टाफलाही श्रेय दिलं.
“खेळाडूंनी संधी सोडू नये”
“मुंबई लीग स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना संधी मिळतेय. खेळाडूंनी ही संधी दवडू नये. यंदा 3 नवे संघ या स्पर्धेत सामील होत आहेत. तसेच महिलांच्या 3 नव्या टीम्स आल्या आहेत. त्यामुळे यंदा या स्पर्धेत चांगली चुरस पाहायला मिळेल”, अशी आशा रोहितने या वेळेस व्यक्त केली.
