
रणजी ट्रॉफी स्पर्धेत सहाव्या टप्प्याचे सामने सुरु आहेत. मुंबईचा सामना हैदराबादशी होत आहे. या सामन्यात मुंबईच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या संधीचा मुंबईच्या सरफराज खानने पुरेपूर फायदा झाला. 82 धावांवर तिसरी विकेट पडल्यानंतर मैदानात उतरला. पण त्याने आपल्या आक्रमक खेळीने सिराजच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबाद संघाला सळो की पळो करून सोडलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सरफराज खान 142 धावांवर नाबाद होत तंबूत परतला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याच्याकडून द्विशतकी खेळीची अपेक्षा होती. झालंही तसंच.. दुसऱ्या दिवशी त्याने जबरदस्त खेळी केली. त्याने आपला फॉर्म पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला आणि द्विशतक ठोकलं. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पाचवं द्विशतक ठोकलं आहे.
सरफराज खानने 219 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकार मारत 227 धावांची खेळी केली. त्याने 103.65 च्या स्ट्राई रेटने धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे मुंबईला 500 पार धावा करण्यात मदत झाली. लंचपर्यंत मुंबईने 8 विकेट गमवून 533 धावा केल्या होत्या. यात आणखी काही धावांची भर पडणार यात काही शंका नाही. पहिल्या डावात सरफराज खानमुळे मुंबईचं पारडं जड झालं आहे. आता उर्वरित दिवसात कसा खेळ होतो याकडे लक्ष लागून असणार आहे. पण सरफराज खानने आपल्या खेळीने पुन्हा एकदा भारतीय निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मार्च ते जुलैपर्यंत भारताचा कोणताही अधिकृत दौरा नाही. पण ऑगस्टमध्ये भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. भारताने या मालिकेत विजय मिळवला तर संधी असेल. पण ही मालिका गमावली तर मात्र अंतिम फेरीचं कठीण होईल. रेड बॉल क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडू कमकुवत दिसत आहे. अशा स्थितीत सरफराज खानचा फॉर्म खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आता त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण चांगली काम करणं भाग आहे.