
वडिलांनी अनेक वर्ष कठोर मेहनत घेत घरोघरी जात सिलेंडर पोहचवून पोराला क्रिकेटर केलं. पोराला जे जे पाहिजे ते पुरवलं. पोरानेही घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून क्रिकेटर होण्यासाठी कठोर मेहनतीसह पडेल ते कामही केलं. घरच्यांच्या मेहनतीची जाणीव ठेवली. शून्यातून विश्व निर्माण केलं. घरची साधारण परिस्थिती असताना फक्त इच्छा शक्तीच्या जोरावर क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवला. मिळालेल्या संधीचं सोन करत आयपीएल स्पर्धेत निर्णायक क्षणी एका ओव्हरमध्ये 5 सिक्स ठोकून टीमला जिंकून दिलं. या खेळीने आयुष्य बदललं. वडिलांच्या मेहनतीचं चीज झालं. मुलाच्या कामगिरीमुळे घरची परिस्थिती सुधारली. पोराला ओळखीसह पैसा मिळाला. आता कुठे चांगले दिवस आले होते. मात्र नियतीला हे सुख पाहावलं नाही. आपण हे सर्व बोलतोय ते भारताचा युवा खेळाडू रिंकु सिंह आणि त्याचे वडील खानचंद्र सिंह यांच्याबाबत.
खानचंद्र सिंह यांचं शुक्रवारी 27 फेब्रुवारीला पहाटे दीर्घ आजाराने निधन झालं. रिंकूला वडिलांच्या निधनामुळे टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सोडून उत्तर प्रदेशला यावं लागलं. शुक्रवारीच खानचंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर आता रिंकूने मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिंकु टीम इंडियासह पुन्हा जोडला जाणार आहे. रिंकूने भावनिक न होता अशा संकटाच्या क्षणीही आधी देशाचा विचार केला. त्याच्या या निर्णयामुळे सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.
रिंकूने आयपीएलच्या 16 व्या मोसमादरम्यान केकेआरसाठी खेळताना चेज करताना एका ओव्हरमध्ये 5 सिक्स ठोकून विजयी केलं. रिंकूच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. रिंकूच्या आयुष्याला इथून कलाटणी मिळाली. रिंकु आज जो काही आहे त्यात या खेळीचं जवळपास 99 टक्के योगदान आहे हे कुणीच नाकारणार नाही. आपल्या फिनिशिंगच्या जोरावर अवघ्या काही वर्षांतच रिंकूने टीम इंडियात पदार्पण केलं. इतकंच नाही तर त्याने संघातील स्थानही भक्कम केलं.
रिंकूला टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत राखीव म्हणून संधी देण्यात आली होती. मात्र यंदा त्याचा मुख्य संघात समावेश करण्यात आला. टीम इंडियासाठी उपांत्य फेरीच्या हिशोबाने सुपर 8 मधील 26 फेब्रुवारी रोजी झिंबाब्वे विरूद्ध होणारा सामना फार निर्णायक होता. या सामन्याच्या काही तासांआधी वडिलांची प्रकृती खालावल्याने रिंकु माघारी परतला. मात्र परिस्थिती पाहून रिंकु परतला. रिंकूने झिंबाब्वे विरूद्धच्या सामन्यात पर्यायी खेळाडू म्हणून योगदान दिलं. भारताने हा सामना जिंकला. मात्र सामन्याच्या काही तासांनी रिंकूचा आधारस्तंभ हरपला.
रिंकूच्या वडिलांना लिव्हर कॅन्सर झाला होता. खानचंद्र गेल्या अनेक दिवसांपासून या आजारसह झुंज देत होते. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. खानचंद्र यांनी जगाचा निरोप घेतला. रिंकु वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच घरी परतला. आता सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर रिंकु टीम इंडियासह जोडला जाणार आहे.
एएनआयच्या रिपोर्टनुसार, रिंकु शनिवारी 28 फेब्रुवारीला टीम इंडियासह कोलकातात जोडला जाणार आहे. टीम इंडिया 1 मार्चला सुपर 8 मधील आपला तिसरा आणि शेवटचा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध खेळणार आहे. हा सामना इडन गार्डन्समध्ये होणार आहे. टीम इंडियासाठी उपांत्य फेरीच्या हिशोबाने विंडीज विरुद्धचा सामना फार महत्त्वाचा आहे. रिंकूने टीम इंडियाची गरज लक्षात घेत कुटुंबासह न राहत परतण्याचा निर्णय केलाय. रिंकु सध्या अलीगढमध्ये कुटुंबासह आहे.