
आशिया कप 2025 स्पर्धेतील महाअंतिम सामन्यावरुन राजकीय सामनाही रंगताना पाहायला मिळत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या 2 सामन्यांनंतर आता महामुकाबल्यालाही तीव्र विरोध आहे. मात्र त्यानंतरही हा सामना होणार असल्याचं स्पष्ट आहे. पीव्हीआरकडून हा महाअंतिम सामना विविध ठिकाणी मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. तसेच पीव्हीआरला सुद्धा तुमच्याकडे लक्ष असल्याचं म्हणत थेट इशारा दिला आहे. संजय राऊतांनी त्यांच्या या पोस्टमध्ये कोणत्या मुद्द्यांवरुन निशाणा साधला आहे हे सविस्तर जाणून घेऊयात.
संजय राऊत यांनी भारत-पाक सामना मोठ्या पडद्यावर दाखवण्याच्या पीव्हीआरच्या निर्णयाला नीचपणाचा कळस असं संबोधलं आहे. पीव्हीआरमध्ये एवढी हिंमत आणि निर्ल्लजपणा येतो कुठून? असा प्रश्नही राऊतांनी या पोस्टमधून उपस्थित केला आहे. तसेच राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय आव्हान दिलंय? हे जाणून घेऊयात.
संजय राऊतांनी पीव्हीआरमधील पी हा पाकिस्तानचा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच या पीव्हीआर वाल्यांमध्ये भारत-पाक सामना दाखवण्याची एवढी हिंमत आणि निर्लज्जपणा कुठून येतो? अशा शब्दात राऊतांनी संताप व्यक्त केलाय. तसेच राऊतांनी भारत-पाक सामन्याच्या मुद्दयासोबत सोनम वांगचूक यांना करण्यात आलेल्या अटकेवरुनही सरकावर निशाणा साधलाय.
“सोनम वांगचुक याना पाकिस्तानशी सहानुभूती ठेवल्याच्या आरोपाखाली देशद्रोही ठरवून अटक केली, आता त्याच आरोपाखाली या हरामखोर पीव्हीआर वाल्याना अटक करा, फडणवीस आहे एवढी हिम्मत?”, असं म्हणत राऊतांनी फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं आहे.
संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान
हा तर नीच पणाचा कळस:
PVR मधील” पी “ म्हणजे पाकिस्तान आहे काय?
हे पीव्हीआर वाले भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण सर्वत्र दाखवणार आहेत.
ह्यांच्यात एवढी हिम्मत आणि निर्ल्लजपणा येतो कोठून?
सोनम वांगचुक याना पाकिस्तानशी सहानुभूती ठेवल्याच्या आरोपाखाली देशद्रोही ठरवून अटक… pic.twitter.com/GY7343t8UK— Sanjay Raut (@rautsanjay61) September 28, 2025
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळणं,खेळवणं, दाखव आणि पाहणं, हा पहलगाम हल्ल्यातील सिंदूर उजाडलेल्या महिलांचा अपमान आणि देशद्रोह असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही. पीव्हीआर तुमच्याकडे हिंदुत्ववादी जनतेचे लक्ष्य आहे”, असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान आता संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिलेल्या आव्हानावरुन भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या दणक्यानंतर पीव्हीआरकडून भारत-पाकिस्तान सामन्याचं स्क्रीनिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामना मुंबईतील पीव्हीआर सिनेमामध्ये दाखवला जाणार होता.मात्र ठाकरे शिवसेनेच्या निषेधानंतर स्क्रीनिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.