IND vs AUS: भारताने टॉस गमावताच सूर्यकुमार यादवची अशी होती रिएक्शन, काय झालं पाहा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा टी20 सामना मेलबर्नमध्ये सुरु आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. भारताचा संपूर्ण संघ फक्त 125 धावा करू शकला. पण नाणेफेकीवेळी एक किस्सा घडला.

IND vs AUS: भारताने टॉस गमावताच सूर्यकुमार यादवची अशी होती रिएक्शन, काय झालं पाहा
IND vs AUS: भारताने टॉस गमावताच सूर्यकुमार यादवची अशी होती रिएक्शन, काय झालं पाहा
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Oct 31, 2025 | 4:26 PM

भारत ऑस्ट्रेलिया दुसरा टी20 सामना मेलबर्नमध्ये होत आहे. या सामन्यातही नाणेफेकीने भारताचं शुक्लकाष्ठ काही सोडलं नाही. या सामन्यातही भारताला नाणेफेकी कौल गमवावा लागला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. मिचेल मार्शने आता टी20 मध्ये 19 वेळा टॉस जिंकला आहे आणि प्रत्येक वेळी पाठलाग करण्याचा पर्याय निवडला आहे. पण नाणेफेकीचा कौल पाहून समालोचक रवि शास्त्री आणि सामनाधिकाऱ्यांना हसू आवरलं नाही. इतकंच काय तर कर्णधार सूर्यकुमार यादवही आपल्या भावना आवरू शकला नाही. रवि शास्त्रींनी तर थेट सूर्यकुमार यादवला नाणेफेक जिंकण्यासाठी सराव करण्याचा सल्ला दिला. इतकंच काय तर अक्षर पटेलनेही कर्णधार सूर्यकुमार यादवची फिरकी घेतली.

नाणेफेकीचा कौलासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श आणि कर्णधार सूर्यकुमार यादव मैदानात उतरले. मिचेल मार्शच्या हातात नाणं होतं आणि त्याने हवेत उडवलं. सूर्यकुमार यादवने क्षणाचाही विलंब न करता टेल्स असा कौल मागितला. पण नाणं जेव्हा जमिनीवर पडले तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने कौल लागला. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर सूर्यकुमार यादवला हसू आवरलं नाही. इतकंच काय तर त्याने ड्रेसिंग रूमकडे इशारा करत सांगितलं की, आता पूजा आरती करण्याची गरज आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘आम्हाला प्रथम फलंदाजी करायला आनंद होत आहे. आम्हाला आक्रमक क्रिकेट खेळायचे आहे. शुबमनला धावा कशा करायच्या हे माहित आहे. त्याच्यासोबत तुम्हाला विकेटमध्येही खूप धावावे लागते. आम्ही एकाच संघाविरुद्ध खेळत आहोत .’

भारताने दुसऱ्या टी20 सामन्यात अक्षरश: नांगी टाकली. अभिषेक शर्मा वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. भारताचा डाव अवघ्या 125 धावांवर आटोपला. भारताकडून अभिषेक सऱ्माने 37 चेंडूत 68 धावांची खेळी केली. यात त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. तर हार्षित राणा 35 धावा करून बाद झाला. या व्यतिरिक्त कोणाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. तिघांना तर खातंही खोलता आलं नाही. शुबमन गिल 5, संजू सॅमसन 2, सूर्यकुमार यादव 1, तिलक वर्मा 0, अक्षर पटेल 7, शिवम दुबे 4, कुलदीप यादव 0, जसप्रीत बुमराह 0 आणि वरूण चक्रवर्ती 0* असा धावा केल्या आहेत.