T20 World Cup 2026: भारताच्या गटातून चारही संघांना उपांत्य फेरीची संधी, संपूर्ण गणित समजून घ्या
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीचे सामने सुरू असून गट 1 मधील स्थिती रंगतदार वळणावर आहे. या गटात भारत, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ आहे. या चारही संघांना उपांत्य फेरीची संधी आहे. कशी काय ते समजून घ्या...

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील गट 1 मधील दोन सामन्यांचा खेळ पार पडला आहे. दक्षिण अफ्रिकेने भारताला आणि वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला पराभूत केलं आहे. आता प्रत्येक संघाला सुपर 8 फेरीत दोन दोन सामने खेळायचे आहेत. पण दुसऱ्या सामन्यातच उपांत्य फेरीचं गणित जवळपास स्पष्ट होईल. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात काय होतं याकडे लक्ष असणार आहे. या टप्प्यात दक्षिण अफ्रिकेचा सामना वेस्ट इंडिजशी आणि भारताचा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. या सामन्यात काय होईल आता सांगणं कठीण आहे. पण सद्यस्थितीत चारही संघांना उपांत्य फेरीची संधी आहे. संपूर्ण गणित तुम्हाला सामने इतर शक्यतांवर कळून येईल.
वेस्ट इंडिज
वेस्ट इंडिजचा संघ या गटात टॉपला आहे. झिम्बाब्वेला 107 धावांनी पराभूत केल्याने 2 गुणांची कमाई झाली. तसेच नेट रनरेट हा +5.350 इतका आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजने उर्वरित दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला तर नेट रनरेटच्या आधारावर आरामात उपांत्य फेरी गाठेल. वेस्ट इंडिजचा पुढचा सामना दक्षिण अफ्रिका आणि भारताशी होणार आहे.
दक्षिण अफ्रिका
दक्षिण अफ्रिकेचा संघ या गटात 2 गुण आणि +3.850 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताला 76 धावांनी पराभूत करून दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरीच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. दक्षिण अफ्रिकेने 2 पैकी एका सामन्यात विजय मिळवला तरी उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेशी सामना होणार आहे. भारत आणि झिम्बाब्वेपेक्षा दक्षिण अफ्रिकेचा नेट रनरेट चांगला आहे.
भारत
भारताने पहिला सामना गमवल्याने उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं आहे. आता झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजशी सामना होणं बाकी आहे. या दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीची आशा वाढेल. पण नेट रनरेट सुधारणं खूप गरजेचं राहील. पण दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत केलं तर मात्र गणित नेट रनरेटवर नाही. तर जय पराजयावर असेल. पण त्याआधी टीम इंडियाला झिम्बाब्वेला पराभूत करणं आवश्यक आहे.
झिम्बाब्वे
झिम्बाब्वेचा पहिल्याच सामन्यात दारूण पराभव झाला. त्यामुळे झिम्बाब्वेला उपांत्य फेरी गाठायचं असेल तर उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. झिम्बाब्वेचा सामना भारत आणि दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. झिम्बाब्वेने भारताला पराभूत केलं तर वाटेतून एक स्पर्धक कमी होईल. वेस्ट इंडिजने दक्षिण अफ्रिकेला हरवलं तर गणित सोपं होईल. दक्षिण अफ्रिका झिम्बाब्वे सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरी गाठेल.
