टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडिया; इंग्लंड पराभूत पण बरंच काही घडलं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना धाकधूक वाढवणारा ठरला. या सामन्यात कोण बाजी मारणार हे सांगणं शेवटच्या षटकापर्यंत कठीण झालं होतं. शेवटच्या षटकात 30 धावांची गरज होती. बेथेलची विकेट मिळाली आणि भारतीय संघ सामन्यात परतला.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडिया; इंग्लंड पराभूत पण बरंच काही घडलं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडिया, इंग्लंड पराभूत पण बरंच काही घडलं
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 05, 2026 | 11:36 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने धडक मारली आहे. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडला फक्त 7 धावांनी पराभूत केलं. फक्त हा शब्द वापरण्याचं कारणच तसं आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 253 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण इंग्लंडने या धावांचा पाठलाग करताना 246 धावा केल्या. यावरून या सामन्यात गोलंदाजांची काय अवस्था झाली याचा अंदाज येतो. या सामन्यात खोऱ्याने धावा झाल्या. म्हणजेच विक्रमांची रांग लागली असणार यात काही शंका नाही. उपांत्य फेरीच्या सामन्यात बरंच काही घडलं आहे. काही भारताच्या बाजूने, तर काही इंग्लंडच्या बाजूने.. हा सामना संपल्यानंतर आकडेवारी पाहता तुम्हीही तसंच म्हणाल.. चला या सामन्यात नेमकं काय काय घडलं ते जाणून घेऊयात…

टी20 वर्ल्डकप 2016 स्पर्धेत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हायव्होल्टेज सामना झाला होता. दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड आमनेसामने आले होते. तेव्हा सुपर 10 फेरीत दक्षिण अफ्रिकेने 229 धावांचं लक्ष्य दिलं होतं. ते लक्ष्य इंग्लंडने 19.4 षटकात पूर्ण केलं होतं. तेव्हा या सामन्यात दोन्ही बाजूंची बेरीज करता 459 धावा झाल्या होत्या. आता हा विक्रम मोडीत निघाला असून या मैदानात 499 धावा झाल्या आहेत.

टी20 आंतरराष्ट्रीय पुरूष स्पर्धेतील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बेरीज आहे. पहिल्या क्रमांकावर दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघ आहेत. यांनी 2023 मधील एका सामन्यात एकूण 517 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारत इंग्लंड सामन्याचा नंबर लागतो. या सामन्यात 499 धावा झाल्या.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या एका एका सर्वाधिक षटकारांचा विक्रम या सामन्यात नोंदवला गेला. या सामन्यात एकूण 34 षटकार मारले गेले. यापूर्वी हा विक्रम झिम्बाब्वे वेस्ट इंडिज सामन्यात झाला होता. तेव्हा एकूण 31 षटकार मारले होते. आता तीन षटकार अधिक मारून हा सामना चर्चेत आला आहे.

या सामन्यात एकूण 73 चौकार आणि षटकारांची नोंद झाली आहे. 39 चौकार आणि 34 षटकार मारले गेले आहेत. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी वानखेडेवर इंग्लंड दक्षिण अफ्रिका सामन्याता 61 चौकार षटकार मारले गेले होते.

भारताने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठत एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी सलग दोनदा अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या नावावर होता. पाकिस्तानने 2007 आणि 2009 मध्ये, तर श्रीलंकेने 2012 आणि 2014 मध्ये अंतिम फेरी गाठली होती.

Follow Us