
आगामी आशिया कप 2025 स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मंगळवारी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली. त्यानंतर आता अवघ्या काही तासांनी आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना मोठा झटका लागला आहे. भारतीय संघाची अनुभवी जोडी या रँकिंगमधून बाहेर नाही तर थेट गायबच झाली आहे. या जोडीची एकाच आठवड्यात सारखीच स्थिती झाली आहे. आयसीसीच्या गेल्या आठवड्यातील बॅटिंग रँकिंगमध्ये रोहित आणि विराट टॉप 5 मध्ये होते. मात्र ताज्या आकडेवारीत या दोघांना बाहेर करण्यात आलं आहे.
रोहित आणि विराट हे दोघेही वनडे रँकिंगमध्ये चांगल्या स्थितीत होते. दोघेही पहिल्या पाचात असल्याने क्रिकेट चाहतेही आनंदी होते. तेव्हा रोहित 756 रेटिंगसह दुसऱ्या स्थानी होता. तर विराट चौथ्या क्रमांकावर होता. विराटच्या खात्यात तेव्हा 736 रेटिंग होते. विराट चौथ्या क्रमांकावर होता. मात्र आता हे दोघेही रँकिंगमध्येच नाहीत.
रोहित आणि विराट या दोघांचा अचानक आयसीसी वनडे रँकिंगमधून अचानक पत्ता कट का आणि कशामुळे झाला? या मागे आयसीसीचा कोणता नियम आहे की हे चुकीमुळे झालंय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच या निमित्ताने आपण आयसीसीचा नियम जाणून घेऊयात.
आयसीसीच्या रँकिंग नियमानुसार, खेळाडू निवृत्त झाला असेल किंवा तो 9-12 महिने एकही एकदिवसीय सामना खेळला नसेल तर त्याचा क्रमवारीतील पहिल्या 100 खेळाडूंमध्ये समावेश केला जात नाही. मात्र विराट आणि रोहितला हे दोन्ही निकष लागू होत नाही. विराट आणि रोहित हे दोघे मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळले होचे. दोघांनी शेवटचा सामना हा 5 महिन्यांआधी खेळला होता. तसेच दोघे फक्त टी 20i आणि कसोटीमधून निवृत्त झाले आहेत. मात्र त्यानंतरही असं का झालं? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हिंदूस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, रोहित आणि विराटसोबत असं होण्यामागे नियम वगैरे काही नाही. तर हे तांत्रिक कारणामुळे झालं असावं. त्यामुळे आयसीसीकडून पुन्हा एकदा सुधारित क्रमवारी जाहीर करण्यात येऊ शकते.