IND vs WI : यशस्वीची विक्रमी खेळी, पहिला दिवस टीम इंडियाचा, विंडीज विरुद्ध 318 धावा

India vs West Indies 2nd Test Day 1 Highlights : शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघाने अरुण जेटली स्टेडियममध्ये विंडीज विरुद्ध 90 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 318 धावा केल्या.

IND vs WI :  यशस्वीची विक्रमी खेळी, पहिला दिवस टीम इंडियाचा, विंडीज विरुद्ध 318 धावा
Yashasvi Jaiswal and Shubman Gill IND vs WI 2ND Test
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Oct 10, 2025 | 6:22 PM

टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिला दिवस आपल्या नावावर केला आहे. भारताने ओपनर यशस्वी जैस्वाल याच्या विक्रमी खेळीच्या जोरावर दिवसाचा खेळ संपेपर्यंत 300 पार मजल मारली. भारताने खेळसंपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 318 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल ही जोडी नाबाद परतली. कॅप्टन शुबमन गिल याने 68 चेंडूत 20 धावा केल्या. तर यशस्वी 173 धावांवर नाबाद आहे. त्यामुळे चाहत्यांना दुसऱ्या दिवशी यशस्वीकडून दुसऱ्या द्विशतकाची अपेक्षा आहे.

शुबमनने तब्बल 6 सामन्यांनंतर टॉस जिंकला. शुबमनने बॅटिंगचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि यशस्वी या जोडीने भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. या सलामी जोडीने 58 धावांची भागीदारी केली. भारताला केएलच्या रुपात पहिला झटका लागला. केएलने 58 चेंडूत 38 धावा केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी

केएल आऊट झाल्यानंतर साई सुदर्शन यशस्वीची साथ देण्यासाठी मैदानात आला. साई आणि यशस्वी या दोघांनी भारताला 250 पार पोहचवलं. दोघांनी 306 बॉलमध्ये 193 धावा केल्या. साईला शतक करण्याची संधी होती. मात्र अवघ्या काही धावांनी साईचं शतक हुकलं. साई शतकापासून 13 धावांनी दूर राहिला. साईने 165 चेंडूत 87 धावा केल्या. साई आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 2 आऊट 251 असा झाला.

साईनंतर शुबमन मैदानात आला. शुबमनने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वी जैस्वाल याला चांगला साथ दिली. या जोडीने भारताला 300 पार पोहचवलं.

भारताच्या सत्रनिहाय धावा

भारताने पहिल्या आणि तिसऱ्या सत्राच्या तुलनेत दुसऱ्या सत्रात सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या सत्रात एकूण 28 षटकांचा खेळ झाला. भारताने या सत्रात 3.36 च्या रनरेटने 94 धावा केल्या. दुसऱ्या सत्रात भारताने 30 ओव्हरमध्ये 4.20 च्या रनरेटने 126 धावा केल्या. विशेष म्हणजे भारताने दुसऱ्या सत्रात एकही विकेट गमावली नाही. तर तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात टीम इंडियाने 32 षटकांमध्ये 98 धावा केल्या. भारताने अशाप्रकारे तिन्ही सत्रांसह पहिला दिवस आपल्या नावावर केला.

टीम इंडियाची कडक सुरुवात

वेस्ट इंडिजची बॉलिंग

वेस्ट इंडिजकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. मात्र एकालाही भारताला अडचणीत आणता आलं नाही. विंडीजकडून जोमेल वॉरिकॅन याने दोन्ही विकेट्स मिळवल्या. जोमेलने 20 ओव्हरमध्ये 3 च्या इकॉनॉमीने 60 रन्स देत दोन्ही विकेट्स मिळवल्या.