विराट-रोहितसह या सहा खेळाडूंचं ठरलं! वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत अशी असू शकते टीम इंडिया
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी आता फक्त 14 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे . असं असताना टीम इंडियाची संघ बांधणी सुरू आहे. या संघात काही खेळाडूंची नावं निश्चित मानली जात आहेत.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी मोर्चेंबांधणी सुरू आहे. भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. ही स्पर्धा दक्षिण अफ्रिकेत असल्याने तिथल्या भूमीत कोणता खेळाडू चालेल? इथपासून अनुभव वगैरे लक्षात घेतला जात आहे. असं असताना टीम इंडियाचे या स्पर्धेपूर्वी काही प्रयोग सुरू असून खेळाडूंची चाचपणी केली जात आहे. नुकतीच भारताने इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. ही मालिका भारताने 1-2 ने गमावली, पण काही खेळाडूंची वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या हिशेबाने चाचपणी झाली आहे. त्यात विराट कोहलीचं स्थान पक्कं मानलं जात आहे. तर रोहित शर्माच्या स्थानाबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहे. असं असताना काही खेळाडूंची वनडे वर्ल्डकप स्पर्धेत स्थान पक्कं मानलं जात आहे.
या सहा खेळाडूंची नावं निश्चित!
दक्षिण अफ्रिकेत वनडे वर्ल्डकप स्पर्धा होणार असल्याने भारतीय संघाला अनुभवी खेळाडूंची गरज आहे. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं नाव आघाडीवर आहे. कारण या दोन्ही खेळाडूंनी वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यात मागच्या पर्वात टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्माच्या खांद्यावर होतं. पण दुर्दैवाने भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना गमावला आणि स्वप्न भंगलं. त्यामुळे या दोघांना संघाबाहेर करण्याचा विचार निवड समिती शक्यतो करणार नाही.
शुबमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर श्रेयस अय्यरचं स्थान या संघात पक्क वाटत आहे. कारण त्याच्यामुळे चौथ्या क्रमांकाचा समस्या दूर होणार आहे. या स्थानावर खेळून संघाला सावरणारा खेळाडू सध्या तरी भारतीय संघात नाही. त्याने या स्थानावर चांगली कामगिरी केली आहे. तर पाचव्या स्थानासाठी विकेटकीपर फलंदाज केएल राहुलचं स्थान पक्कं मानलं जात आहे. दुसरीकडे गोलंदाजीत जसप्रीत बुमराह हे नाव डोळे झाकून असणार यात काही शंका नाही. त्यामुळे या सहा खेळाडूंची नावं जवळपास निश्चित मानली जात आहेत.
उर्वरित खेळाडूंचं काय?
अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या याच्या नावाचा विचार केला जाईल यात काही शंका नाही. पण या स्पर्धेपूर्वी त्याचा फिटनेस महत्त्वाचा आहे. जर फिट असेल तर नक्कीच संघाचा भाग असेल. पण नसेल तर हर्ष दुबे आणि सारांश जैन यांचा विचार केला जाईल. वेगवान गोलंदाजी हर्षित राणा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा हे पर्याय असतील. तर फिरकी गोलंदाजीसाठी कोणाला संधी द्यायची हा प्रश्न असेल. कारण सध्यातरी कुलदीप यादवच्या रुपाने एकच पर्याय दिसत आहे. पण मागच्या काही महिन्यांपासून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेलं नाही.