Pakistan Cricket: पाकिस्तानचे 10 खेळाडू बेपत्ता! शाहिद आफ्रिदीने नावं घेत पीसीबीवर केला प्रहार
गेल्या काही वर्षात पाकिस्तान क्रिकेटची पुरती वाताहत झाली आहे. दहशतवादाला प्रोत्साहान देता देता क्रिकेटचं नुकसान झालं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही सुमार कामगिरी राहिली. असं असताना आता दहा खेळाडू बेपत्ता झाल्याची तक्रार शाहिद आफ्रिदीने केली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतून पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला. भारताने देखील पाकिस्तानला मोठ्या फरकारने पराभूत केल्याने भडका उडाला आहे. त्यामुळे पाकिस्तानी संघ आणि क्रिकेटपटूंवर टीकेची झोड उठली आहे. इतकंच काय तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डही निशाण्यावर आलं आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने 10 खेळाडूंबाबत थेट प्रश्न विचारला आहे. त्यामुळे शाहिद आफ्रिदीच्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. पाकिस्तानच्या समा टीव्ही चॅनेलवर त्याने या खेळाडूंची नावं वाचून दाखवली. तसेच आता हे खेळाडू नेमके कुठे आहेत, असा प्रश्नही विचारला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बोलती बंद झाली आहे.
शाहिद आफ्रिदीने एक एक नाव घेतली. त्याने या कार्यक्रमाच्या माध्यमातून टीकेचा भडिमार केला. इमाम उल हक कुठे आहे? अब्दुल्ला शफीक ज्याला पाकिस्तान क्रिकेटचं भविष्य मानलं जात होतं, तो मुलगा कुठे आहे? कामरान गुलाम, ज्याची तुलना लोकं एबी डिव्हिलियर्सशी करत होते. पाकिस्तानला एबी डिव्हिलियर्सला मिळाला म्हणून सांगत होते, तो कुठे आहे? या शिवाय सऊद शकील, हसन नवाज, तय्यब ताहिर, सुफयान मुकीम, मोहम्मद हसनैन, खुशदिल शाह, आमिर जमाल हे सर्व खेळाडू काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचं भविष्य होते, पण आज कुठे आहेत?
Shahid Afridi said, “We keep talking about surgery and bringing new kids into the team, but what about the players who were supposed to be the future of Pakistan? Where did they go? Players like Abdullah Shafiq, Sufyan Muqeem, Imam-ul-Haq.”pic.twitter.com/7uUr7mBtSo
— Salman. (@TsMeSalman) March 9, 2026
शाहिद आफ्रिदीने या खेळाडूंची नावं घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला आहे. आज जे चेहरे पाकिस्तान संघात आहेत त्यांच्याकडे अनुभव नाही. ते कामगिरीच्या जोरावरही येथे पोहोचलेले नाहीत. पण ज्या खेळाडूंना पाकिस्तानचं भविष्य मानलं जात होतं. ज्यांच्यावर विश्वास टाकला होता. ते खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून संघात पोहोचले होते. पण आज ते कुठेच दिसत नाहीत?
