IPL 2026 : प्लेऑफमध्ये टॉप 2 का महत्त्वाचं? 6 संघात चुरस, जाणून घ्या कोण आहे शर्यतीत?
IPL 2026 Top 2 Finish Scenario: आयपीएल 2026 स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये कोण जागा मिळवणार हे अजून ठरलं नाही. पण टॉप 2 मध्ये कोण जागा मिळवणार याचं समीकरण बांधलं जात आहे. कारण टॉप 2 मधील संघांना अंतिम फेरीत जाण्यासाठी दोन संधी मिळतात.

आयपीएल 2026 स्पर्धा बघता बघता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पुढच्या पाच सहा सामन्यात टॉप 4 संघ कोणते ते देखील ठरतील. असं असताना टॉप 4 गणित एकीकडे बांधत असताना टॉप 2 संघांची शर्यतही सुरू झाली आहे. टॉप 2 मध्ये असलेल्या संघांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतात. त्यामुळे टॉप 2 जागा खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे या ठिकाणी जागा मिळावी यासाठी संघ जोरदार प्रयत्न करत आहेत. सध्या दहा पैकी सहा संघ हे टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी दावेदार आहे. त्यामुळे या सहा संघांसाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे. सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ अव्वल दोन जागांसाठी शर्यतीत आहेत.
आयपीएल गुणतालिकेत टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी किमान 18 गुणांची आवश्यकता असते. यात सनरायझर्स हैदराबाद हा संघ 18 गुणांच्या जवळपास आहे. सध्या सनरायझर्स हैदराबादने 11 सामने खेळले असून सात सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे 14 गुण पदरात असून उर्वरित तीन पैकी 2 सामने जिंकले तर 18 गुणांचं गणित सुटेल. त्यानंतर पंजाब किंग्सलाही टॉप 2 मध्ये जागा मिळवण्याची संधी आहे. पंजाब किंग्सने 10 सामने खेळले असून 13 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चार सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. त्यापैकी तीन सामने जिंकले तर 19 गुण होतील. हे गुण टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी पुरेसे आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांनाही 18 गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी उर्वरित चार सामन्यांपैकी प्रत्येकी तीन विजयांची आवश्यकता आहे. पण चेन्नई सुपर किंग्सचं गणित किचकट आहे. कारण टॉप 2 मध्ये जागा मिळण्यासाठी प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. चेन्नई सुपर किंग्सने 10 सामन्यापैकी पाच सामन्यात विजय मिळवला असून 10 गुण आहे. उर्वरित चार सामन्यात विजय मिळवला तर 18 गुण होतील. त्यामुळे चेन्नईला टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहे.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांना टॉप 4 मध्ये जागा मिळवणं रामभरोसे आहे. कारण एखाद सामना गमवला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नुसता विजय नाही तर इतर संघाच्या कामगिरीवरही या चार संघांचं अस्तित्व टिकून आहे.
