Icc Odi World Cup 2027 : टीम इंडियाचं मिशन वनडे वर्ल्ड कप, एका जागेसाठी तिघांमध्ये चुरस, कोण ठरणार यशस्वी?
Icc odi World Cup 2027 : टीम इंडियाचं 2023 साली वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंग झालं होतं. भारताला तेव्हा उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे टीम इंडिया 2027 च्या स्पर्धेत वनडे वर्ल्ड कप आपल्या नावावर करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

टीम इंडियाने आयसीसीच्या स्पर्धेत गेल्या 2 वर्षात जबरदस्त कामगिरी केलीय. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2024 साली टी 20i वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर 2025 मध्ये भारताने न्यूझीलंडला पराभूत करुन आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं. त्यानंतर भारताने मायदेशात 2026 मध्ये सलग दुसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली. त्यानंतर आता टीम इंडियाचं पुढील मिशन हे वनडे वर्ल्ड कप 2027 आहे. त्या हिशोबाने टीम मॅनेजमेंटकडून तयारी सुरु झाली आहे. टीम मॅनेजमेंटने आयसीसीच्या या स्पर्धेसाठी 20 खेळाडूंची नावं निश्चित केल्याचं म्हटलं जात आहे. या 20 पैकी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 15 खेळाडूंचा वर्ल्ड कप संघात समावेश केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशात आता एका जागेसाठी 3 खेळाडूंमध्ये चुरस असल्याचं चित्र आहे. त्यामुळे या तिघांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार हे स्पष्ट आहे.
हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि नितीश कुमार रेड्डी या तिघांमध्ये पेस ऑलराउंडर म्हणून चुरस असणार आहे. त्यातही शिवम आणि हार्दिक हे प्रमुख दावेदार आहेत. दोघांनीही नुकत्याच झालेल्या आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत बॅट आणि बॉलिंगने जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे संघातील एक स्थान कोण मिळवण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच टीम मॅनेजमेंट 2 पेस ऑलराउंडर ठेवण्याचा विचार करु शकते.
शिवम दुबे
हार्दिक पंड्या याच्या तुलनेत शिवमला एकदिवसीय सामन्यांमध्ये फार संधी मिळालेली नाही. मात्र शिवमने टी 20I क्रिकेटमध्ये टीम मॅनेजमेंटने त्याच्यावर दाखवलेला विश्वास पूर्णपणे सार्थ ठरवला आहे. त्यामुळे वनडे वर्ल्ड कपसाठी टीम मॅनेजमेंटने शिवमच्या नावाचा विचार केला नाही तरच नवल. शिवमने आतापर्यंत 4 एकदिवसीय सामने खेळले आहेत. आता शिवम टीम मॅनेजमेंटनुसार वनडे वर्ल्ड कप मोहिमेची भाग असणार की नाही? हे त्याला येत्या मालिकेत मिळणाऱ्या संधींवरुन स्पष्ट होईल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्या टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर आहे. हार्दिकने अखेरचा एकदिवसीय सामना हा मार्च 2025 मध्ये खेळला होता. मात्र हार्दिकची दुखापत ही टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. पंड्याला दुखापतीमुळे 2024 साली एकदिवसीय क्रिकेटपासून दूर रहावं लागलं. आश्चर्याची बाब म्हणजे पंड्या वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेनंतर थेट मार्च 2025 मध्ये एकदिवसीय सामना खेळला होता. त्यामुळे पंड्याला या स्पर्धेत खेळायचं असेल तर स्वत:ला दुखापतीपासून दूर ठेवावं लागेल.
नितीश कुमार रेड्डी
नितीश कुमार रेड्डी अनुभवाबाबत हार्दिक आणि शिवमच्या तुलनेत नवखा आहे. तसेच नितीशला वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्याचा तितका अनुभव नाही. नितीशची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अवघ्या काही महिन्यांची आहे. नितीशने 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 अर्धशतकासह 100 धावा केल्या आहेत. मात्र अनुभवाचा विचार करता टीम मॅनेजमेंट हार्दिक आणि शिवम असताना नितीशचा कितपत विचार करेल? हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.
