Team India : मोठा गेम होणार ! सूर्यकुमार यादवची जाणार विकेट ? टीम इंडियात काय घडतंय ?
टी-20 वर्ल्ड कप जिंकूनही सूर्यकुमार यादवचे कर्णधारपद धोक्यात आले आहे. आयपीएलमधील सुमार फलंदाजी आणि दुखापतीमुळे बीसीसीआय नाराज असून त्याच्या जागी श्रेयस अय्यरला भारतीय टी-20 संघाचा कर्णधार बनवले जाण्याची शक्यता आहे. जूनमध्ये निवड समितीच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होऊ शकतो.

भारतीय टी-20 संघात मोठे बदल होऊ शकतात. टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकूनही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा अडचणीच सापडण्याची चिन्ह आहेत. आयपीएल सीझन 2026 सुरू असतानाच त्याच्या नेतृत्वाबद्दल आणि बॅटिंग बद्दल प्रश्न उपस्थित होत असून आयपीएलनंतर त्याची गच्छंती होऊ शकते. सूर्यकुमारच्या सातत्याने कमी होत चाललेल्या धावांमुळे बीसीसीआय नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या जूनमध्ये वरिष्ठ संघ निवड समितीची बैठक होणार असल्याचे समजते. जर त्या वेळी सगळं काही सुरळीत झालं तर कर्णधार सूर्याचा पत्त कट होऊन श्रेयस अय्यरचं पुनरागमन होऊ शकतं. एवढंच नव्हे तर त्याची टी-20 संघाची कर्णधार म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते.
पुढल्या वर्ल्डकपचंही सूर्याला करायचं आहे नेतृत्व
सध्या तरी, सूर्यकुमार यादवचा कर्णधारपदाचा कार्यकाळ संपत आलेला दिसतोय. मात्र या एकमात्र फॉरमॅटमध्ये तो फलंदाज म्हणून खेळणे सुरू ठेवेल की त्याला कर्णधारपदावरून मुक्त केले जाईल, हे आता लवकरच समजेल. मा्र एकीकडे त्याच्या गच्छंतीची चर्चा असली तरी 35 वर्षांच्या सूर्यकुमार यादवला पुढचा वर्ल्डकप आणि ऑलिम्पिकसह पुढील दोन वर्षे कर्णधारपदी राहण्याची इच्छा आहे.
कॅप्टन बनल्यावर आटल्या धावा
मागच्या कार्यकाळात, सूर्याने भारताला 2026 चं टी-20 व्र्लडकपचं विजेतेपद मिळवून दिलं होतं. त्याने नऊ डावांमध्ये 242 धावा केल्या होत्या, ज्यात अमेरिकेविरुद्धच्या संघाच्या पहिल्या सामन्यातील 84 धावांचा समावेश होता. मात्र ती एक मॅच वगळता, हा फलंदाज संपूर्ण स्पर्धेत संघर्ष करत होता, चाचपडत राहिला. जुलै 2024 मध्ये कर्णधारपद स्वीकारल्यापासून, टी-20 प्रकारात सूर्याची कामगिरी निराशाजनक होती. त्याने 45 सामन्यांमध्ये केवळ 932 धावा केल्या आहेत, जी अतिशय सामान्य कामगिरी आहे.
दुखापतीने ग्रस्त सूर्यकुमार ?
बीसीसीआय आणि टीम इंडियामधील विश्वसनीय सूत्रांच्या सांगण्यानुसार, सूर्यकुमार यादव सध्या दुखापतीशी झुंजतोय. मनगटाची दुखापत सहन करत तो सध्या खेळतोय असं दिसतंय. गेल्या सीझनपासून मुंबई इंडियन्सकडून खेळताना, तो उजव्या मनगटाला टेप लावून फलंदाजी आणि फिल्डींग करत आहे. तसेच मनगटावर थेट दाब टाकणारे व्यायामही तो टाळतोय अशी माहिती समोर आली.
असं असलं तरी कर्णधार म्हणून सूर्याची विजयाची टक्केवारी चांगली आहे (76.92 टक्के) आणि त्याने अनेक विजेतेपदे पटकावली आहेत (2025 आशिया कप आणि 2026 टी20 वर्ल्डकप). मात्र त्याची निराशाजनक फलंदाजी, मनगटाची दुखापत आणि वाढते वय यामुळे मॅनेजमेंटला इतर पर्यायांचा शोध घेण्यास भाग आहे. संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्यासारखे कर्णधारही उपलब्ध होते, परंतु तीन वेगवेगळ्या फ्रँचायझींसोबत तीन आयपीएलच्या तीन हंगामांत मिळालेल्या यशामुळे अय्यरचं नावं आघाडीवर असल्याचे दिसतं.
