IPL 2025 : हार्दिक पंड्यावर बॅन, पहिल्या मॅचला मुकणार ? मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का, नेमकं झालं तरी काय ?
IPL 2025: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल सुरू होण्यास आता काही दिवस उरले आहेत. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या या लीगमधील पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळू शकणार नाही, त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. काय आहे प्रकरण, जाणून घेऊया.

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएल 2025 चा सीझन सुरू होण्यास आता जेमतेम 10 दिवस उरले आहेत. या सीझनकडे सर्व चाहत्यांच्या नजरा लागल्या असून यंदा आयपीएलचा चषक कोण जिंकणार याचीही लोकांना उत्सुकता आहे. मात्र याच दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएलचे सुरुवातीचे सामने मुंबईसाठी (Mumbai Indians) आव्हानात्मक असणार आहेत. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे काही सामन्यांमधून बाहेर बसणार आहे, तर कॅप्टन हार्दि पंड्या हा देखील पहिली मॅच खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर बंदी घालण्यात आल्याने तो पहिला सामना खेळण्यापासून मुकणार आहे. 23 मार्च रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणार आहे. IPL ला अजून सुरुवात देखील झालेली नाही, मग हार्दिकवर बंदी का? असा सवाल तुमच्याही मनात आला असेल ना… चला जाणून घेऊया सविस्तर बातमी
हार्दिक पांड्याने 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळून त्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 2021 पर्यंत तो या फ्रँचायझीचा महत्त्वाचा खेळाडू राहिला. 2022 मध्ये गुजरात टायटन्समध्ये तो गेला आणि कर्णधार म्हणून खेळले आणि पहिल्याच वर्षी त्यांना चॅम्पियन बनवले. तर 2023 मध्येही, त्याच्या नेतृत्वाखाली, त्याने गुजरातला अंतिम फेरीत नेले, जिथे त्याचा संघ CSK कडून पराभूत झाला. गुजरातकडून 2 हंगाम खेळल्यानंतर, नोव्हेंबरमध्ये हार्दिक हा मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि आयपीएल 2024 मध्ये मुंबईची जबाबदारी स्वीकारली.
आयपीएल 2025मध्ये पहिल्या मॅचमध्ये हार्दिकव बंदी का ?
IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. या कालावधीत संघाला स्लो ओव्हर रेटसाठी 3 वेळा दंड ठोठावण्यात आला. जेव्हा कर्णधार पहिल्यांदा दोषी आढळतो तेव्हा 12 लाख रुपयांचा दंड आकारला जातो. असे दुसऱ्यांदा घडल्यास कर्णधार आणि इतर 24 खेळाडूंना प्रत्येकी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पण तिसऱ्ंदा देखील अशी चूक झाल्यास त्या चुकीसाठी कर्णधाराला 30 लाखांचा दंड आणि एका सामन्याची बंदी घालण्यात येते. तसेच इतर खेळाडूंनाही दंड ठोठावण्यात आला आहे.
IPL 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळताना, मुंबई इंडियन्सचा संघ हा सीझनमध्ये तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला. त्यामुळे हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घातली आहे, त्यामुळे तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा पहिला सामना खेळू शकणार नाही, त्यानंतर तो संघात परत येईल असे समजते.
