Devendra Fadnavis : रोहित-कोहलीच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांकडून एका खेळाडूच विशेष कौतुक, म्हणाले, त्याने….
Devendra Fadnavis : "चॅम्पियन्स ट्रॉफीवर तीनवेळा नाव कोरणारा भारत एकमेव देश बनला आहे. ही जी चॅम्पियन टीम आहे, त्यांचं निश्चित स्वागत करण्याची इच्छा आहे. आज सभागृहाच्यावतीने अभिनंदनाचा ठराव करुया. महाराष्ट्र विधानसभेचा हा ठराव प्रशस्तीपत्राच्या रुपाने टीममधल्या प्रत्येक सदस्याला पाठवला पाहिजे" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यांनी भारतीय टीमच भरभरुन कौतुक केलं. “कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वात या टीमने प्रचंड मेहनत केली. शेवटच्या सामन्यात कॅप्टन इनिंग्स रोहित शर्मा खेळले. ज्या प्रकारे त्यांनी आपली नेहमीची स्टाइल बदलून मध्ये वेगाने, मध्ये संथ अशा प्रकारे पीचवर टीकून 76 धावा जोडल्या. या 76 धावा निर्णायक होत्या. म्हणून मी मनापासून अभिनंदन करतो” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “हा विजय म्हणजे असंख्य भारतीय क्रिकेटप्रेमींना अविस्मरणीय अशी भेट आपल्या संघाने दिली आहे. या सगळ्या टुर्नामेंट दरम्यान भारतीय संघात एक सांघिक भावना पहायला मिळाली. ते वाखणण्यासारखं आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“चॅम्पियन्स ट्रॉफी सातत्याने आपल्याला हुलकावणी देत होती. मागच्या वेळेस शल्य होतं, ते शल्य काल पूर्ण करु शकलो. लागोपाठ दोनवेळा आयसीसी ट्रॉफी मागच्या वर्षी T20 वर्ल्ड कप आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी अशा दोन्ही टुर्नामेंट जिंकणारा भारत एकमेव देश झालेला आहे” असं फडणवीस म्हणाले. “खरं म्हणजे या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरुवातीच्या काळात अनेक टीकाकार हे रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याबाबत बोलत होते. ते फॉर्ममध्ये आहेत, नाहीत अशी चर्चा त्या ठिकाणी सुरु होती. पण फॉर्म टेम्पररी असतो, क्लास परमन्ट असतो, हे दोघांनी याठिकाणी दाखवून दिलय” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
‘आपण काय आहोत हे दाखवून दिलं’
“रोहित शर्माने क्लासी बॅटिंग, त्याच्याआधीच्या सामन्यात विराट कोहलीकडून पहायला मिळाली. त्यांनी दाखवून दिलं की, ते अनुभवी पण यंग अशा प्रकारचे खेळाडू आहेत” असं फडणवीस म्हणाले. “वरुण चक्रवर्ती या खेळाडूच मला विशेष कौतुक करावसं वाटतं. ते आपल्या शालेय जीवनात क्रिकेट खेळले. पण त्यानंतर आर्किटेक्ट झाले. क्रिकेटशी नातं तुटलं, आर्किटेक्ट म्हणून नोकरी केली. पण त्यांच्या रक्तात क्रिकेट होतं. पुन्हा क्रिकेटकडे वळले. आज त्यांच्या फिरकीसमोर सगळे नेस्तनाबूत झाले. त्यांनी आपण काय आहोत हे दाखवून दिलं” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वरुण चक्रवर्तीच कौतुक केलं. “वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी महत्त्वाच्या क्षणी महत्त्वाच्या विकेट्स काढल्या” असं देवेंद्र फडणवीस सभागृहात बोलताना म्हणाले.
