Shahid Afridi : शाहीद आफ्रिदीच्या भारत द्वेषाचं कारण अखेर समोर, BSFने आफ्रिदीच्या भावाला…
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तान सरकारची बोबडी वळली असून ते चिथावणीखोर विधाने करत आहेत. एवढंच नव्हे तर काही क्रिकेटपटूही यात सामील झाले आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्याविरुद्ध वादग्रस्त विधाने केली होती. आफ्रिदी नेहमीच भारताविरुद्ध वक्तव्ये करताना दिसतो. पण त्यामागे कारणही तसंच आहे, तेही 22 वर्षांपूर्वीचं...

22 एप्रिल रोजी जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे. ज्यामुळे पाकिस्तानची भीतीने बोबडी वळली आहे. पण दुसरीकडे, याच पाकिस्तानकडून सतत चिथावणीखोर विधाने केली जात आहेत. त्यात काही माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू देखील आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीही गेल्या काही दिवसांपासून भारताविरुद्ध वादग्रस्त विधाने करत आहे. एवढंच नव्हे तर त्याने भारतीय सैन्यालाही लक्ष्य केलं होतं. पण शाहिद आफ्रिदीचा भारताविरुद्धचा हा द्वेष विनाकारण नाही. यामागे 22 वर्षांपूर्वी घडलेली एक घटना आहे, जी त्याच्या जिव्हारी लागली आणि तो भारताचा द्वेष करत वाट्टेल ते बरळू लागला.
2003 मध्ये BSFने आफ्रिदीच्या दहशतवादी भावाला घातल्या गोळ्या
ही घटना 2003 सालची आहे. जेव्हा माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा दहशतवादी भाऊ शाकिब याचा भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (BSF) पाठलाग केला आणि त्याला गोळ्या घातल्या होत्या. 7 सप्टेंबर 2003 रोजी अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत बीएसएफने शाकिबला ठार मारले. भावाचा जीव गेला आणि तेव्हापासून शाहिद आफ्रिदी भारताचा द्वेष करू लागला. बीएसएफने शाहिद आफ्रिदीचा चुलत भाऊ शाकिब याचे हरकत-उल-अन्सारचा बटालियन कमांडर म्हणून वर्णन केले होते. शाकिबचे दहशतवादी हाफिज सईदशी संबंध होते, असे म्हटले जाते. तेव्हा शाकिबकडून जप्त केलेल्या कागदपत्रांवरून त्याचे शाहिद आफ्रिदीशी असलेले संबंध सिद्ध होतात, असे बीएसएफने नमूद केलं होतं. रण त्यावेळी शाहिद आफ्रिदीने हे थेट नाकारलं होतं.
पेशावरचा होता शाकिब
मिळालेल्या माहितीनुसार, शाकिब हा पेशावरचा रहिवासी होता आणि मारला जाण्यापूर्वी तो सुमारे दीड वर्ष अनंतनाग परिसरात सक्रिय होता. 2003 मध्ये शाहिद आफ्रिदी हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा नियमित क्रिकेटपटू होता. त्यावेळी शाहिद आफ्रिदीने त्याच्या दहशतवादी चुलत भावाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले होते. पठाण कुटुंब खूप मोठे आहे आणि मी माझ्या अनेक चुलत भावांना विसरलो आहे, असं आफ्रिदीतर्फे वृत्तपत्रांत नमूद करण्यात आलं होतं. माझं कुटुंब खूप मोठे आहे, मला माहित नाही की माझा चुलत भाऊ कोण आहे आणि कोण काय करतो याचीही कल्पना नाही, असं आफ्रिदी म्हणाला होता.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर केले होते मोठे आरोप
शाहिद आफ्रिदीने अलीकडेच भारतावर एक मोठा आरोप केला. दहशतवादी तासभर पहलगाममध्ये लोकांना मारत राहिले आणि 8 लाखांपैकी एकही भारतीय सैनिक आला नाही, परंतु जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी पाकिस्तानवर आरोप केले. भारत स्वतः दहशतवाद पसरवतो, स्वतःच्या लोकांना मारतो आणि नंतर पाकिस्तानला दोष देतो. कोणताही देश किंवा धर्म दहशतवादाचे समर्थन करत नाही. आम्ही नेहमीच शांततेचे समर्थन करतो. इस्लाम आम्हालाला शांती शिकवतो आणि पाकिस्तान कधीही अशा कारवायांना पाठिंबा देत नाही. आम्ही नेहमीच भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे , असे म्हणत आफ्रिदीने भारताविरुद्ध गरळ ओकली होती.
