Pakistan : गजब बेज्जती है यार… टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच PCB ने चोळलं जखमेवर मीठ,पाक खेळांडूवर मोठी कारवाई
T20 World Cup Pakistan : टी-20 वर्ल्ड कपमधील खराब कामगिरी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना महागात पडली आहे. कारण आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (पीसीबी) या खेळाडूंवर मोठी कारवाई केली जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने चार सामने जिंकले, दोन गमावले आणि एक अनिर्णित राहिला. इंग्लंडविरुद्धचा सुपर 8 सामना आणि न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने, पाकिस्तानी संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळू शकला नाही.

टी-20 वर्ल्डकपमधील ( T20 World Cup) अत्यंत सुमार, बकवास कामगिरीनंतर पाकिस्तानी संघाची (Pakistan Team) मान लाजेने खाली गेली आहे. इंग्लंडविरुद्धचा सुपर 8 सामना आणि न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने, पाकिस्तानी संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळू शकला नाही. आणि मोठमोठ्या वल्गना करणारा पाक संघ स्पर्धेबाहेर पडला. आणि आता त्यांच्या या जखमेवर त्यांच्याच देशात मीठ चोळलं जाणार आहे, कारण वर्ल्डकप बाहेर पडलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघावर पीसीबी मोठी कारवाई करणार असून त्यांना तब्बल 50 लाख पाकिस्तानी रुपये ( सुमारे 16 लाख भारतीय रुपये) दंड ठोठावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
एखादा सामना किंवा मालिक जिंकल्याबद्दल संघांना बक्षिसे मिळतात हे आपण अनेकदा ऐकलं असेल, परंतु पराभवानंतर संघाच्या प्रत्येक खेळाडूला दंड ठोठावला जाण्याची ही एक अनोखी आणि असामान्य घटना आहे. खरं तर, भारताविरुद्धच्या पराभवानंतर लगेचच हा निर्णय घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी खेळाडूंना स्पष्टपणे सांगितलं आहे की लाड पुरे झाले. आतापासून आर्थिक फायदे, बक्षीस हे केवळ कामगिरीवर आधारित असेल असंही त्यांना बजावण्यात आलं आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आधीच टीकेचा सामना करावा लागत आहे, त्यात या दंडाची भर पडली असून ही मोठी रक्कम आहे. पीसीबी स्वतः दंड वसूल करणार आहे. म्हणजेच खेळाडूंना त्यांच्या पगारातून, सामन्याच्या शुल्कातून किंवा इतर देयकांमधून पैसे भरावे लागतील.
सुपर-8 मधून पाकिस्तान बाहेर
टी20 वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा संघ नेदरलँड्सविरुद्ध पराभूत होता होता बचावला आणि नंतर त्यांनी अमेरिकेवर विजय मिळवला. श्रीलंकेच्या परिस्थितीशी परिचित असल्याने आणि दर्जेदार फिरकी गोलंदाजांच्या उपस्थितीमुळे, भारताविरुद्ध पाकिस्तान चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, परंतु आशिया कपमधील तीन सामन्यांप्रमाणे, यावेळीही पाक संघ विजय मिळवण्यात अपयशी ठरला. नामिबियाला हरवल्यानंतर, पाकिस्तान सुपर 8 मध्येही कसाबसा पोहोचला. न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्यानंतर पाकला इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या पाकच्या आशा धुळीस मिळाल्या. इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्याने पाकिस्तानच्या आशा पुन्हा जागवल्या, परंतु श्रीलंकेविरुद्धच्या जेमतेम मिळालेल्या विजयामुळेही त्यांच्या रेटमध्ये लक्षणीय सुधारणा झाली नाही. त्यामुळेच, न्यूझीलंडनेही सेमी फायनल गाठली आणि पाकिस्तानचा प्रवास आधीच संपला.
भारताविरुद्ध हरताच संतापली पीसीबी
पाकिस्तानी चाहत्यांप्रमाणेच, पीसीबीचे म्हणजेच बोर्डाचे अधिकारी देखील संघाच्या कामगिरीवर खूप नाराज आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक खेळाडूला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. खेळाडूंना जर चांगल्या कामगिरीसाठी बक्षिसे मिळत असतील, तर त्यांना खराब कामगिरीसाठी दंड देखील भरावा लागेल, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर संघाला लगेचच या निर्णयाची माहिती देण्यात आली. पीसीबी त्यांच्या अ-श्रेणीतील खेळाडूंना मासिक 45 लाख रुपये वेतन देते, तसेच आयसीसीच्या महसुलातून 27 लाख रुपयेही दिले जातात. तर ब श्रेणीतील खेळाडूंना मासिक 30 लाख आणि आयसीसीचा वाटा म्हणून 15 लाख रुपये मिळतात. क श्रेणीतील खेळाडूंना मासिक पगार 10 लाख आणि आयसीसीचा वाटा 10 लाख रुपये मिळतो. आणि ड श्रेणीतीली खेळाडूंना 7 लाख मासिक वेतन आणि आयसीसीकडून 5 लाख मिळतात. मॅच फी वेगळी असते. 1 जुलै 2025 ते 30 जून 2026 पर्यंतच्या केंद्रीय करारांमध्ये कोणत्याही खेळाडूचा अ श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला नाही.
पाकची निराशाजनक कामगिरी
टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान हा सर्वाधिक, 383 धावा करणारा फलंदाज होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतर अव्वल फलंदाज, सैम अयुब, सलमान अली आगा, बाबर आझम आणि उस्मान खान, हे संपूर्ण स्पर्धेत वैयक्तिकरित्या 100 धावाही करू शकले नाहीत. तसेच फिरकी गोलंदाज उस्मान तारिक ( 10 विकेट्स) वगळता गोलंदाजांनी सरासरी कामगिरी केली. प्रशिक्षक माइक हेसन यांच्या जवळचा मानला जाणारा कर्णधार सलमान अली आगा हाही फलंदाजीत पूर्णपणे अपयशी ठरला आणि कर्णधार म्हणून त्याच्या निर्णयक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यामुळे येत्या काळात पीसीबी आणखी कठोर निर्णय घेऊ शकते.
