शरद पवारांशी संबंधित ट्रस्ट मोदींना आमंत्रण देणार? राज्यात समीकरणं बदलण्याचे संकेत? काय घडतंय पडद्यामागे?
ज्येष्ठ नेते शरद पवार संबंधित ट्रस्टकडून पंतप्रधान मोदींना बारामतीत आमंत्रण देण्याची तयारी सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडी आणि 'इंडिया' आघाडीच्या चिंता वाढवणारी ही घडामोड पवारांच्या भेटीनंतर चर्चेत आली आहे, ज्यामुळे पडद्यामागे नक्की काय सुरू आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पवार एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असतानाच आता नवीन बातमी येऊ धडकली आहे. या बातमीने महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं टेन्शन वाढू शकत. पुण्यातील पवारांशी संबंधित एका ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्याची तयारी सुरू झाली आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठाणच्या ट्रस्टींनी मोदींना कार्यक्रमाचं आमंत्रण देण्याचा शरद पवार यांना आग्रह धरला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा समीकरण बदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
ट्रस्टने प्रेरणा स्थळ नावाने एक डोम उभारला आहे. त्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावं असं ट्रस्टचं म्हणणं आहे. ट्रस्टचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत कळवणार असल्याचा विश्वास ट्रस्टींना दिला आहे. त्यामुळे मोदी बारामतीत येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तर, दुसरीकडे पवारांनी आधीच दोन्ही एनसीपीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे पडद्याआड नक्की काय घडतंय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तेव्हाच पवार…
दरम्यान, जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतो, एकजुटीची मोट बांधत असतो, तेव्हाच शरद पवार असं काही पाऊल उचलतात की सर्व आघाडीतील सहकारी गॅसवर जातात. शरद पवार यांच्या राजकारणाची पद्धत नेहमीच अशी राहिली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत नेहमी संभ्रम कायम राहतो.
शिंदेंना भेटले अन्…
शरद पवारांनी पहिल्यांदाच असं केलेलं नाही. यापूर्वीही त्यांनी असं केलंय. गेल्या आठवड्यातच पवार मोदींना भेटले तेव्हा पवार एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्या आधी पवार महाराष्ट्राच्या विधानसभेत आले होते. तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात मिटिंग घेतली. यावेळी शिंदेंनी पवार यांचं स्वागत केलं. पवार यांच्या या कृतीने ठाकरे गट चांगलाच दुखावला होता. खासदार संजय राऊत यांनी पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांना खुलासा करावा लागला होता.
