Team India | संकटमोचक गवसला; हजारे ट्रॉफीत 4 सामन्यात 139 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 2 शतकासह 1 अर्धशतक, रोहित-द्रविडची चिंतामुक्ती…!
कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडची दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबतची चिंता आता दूर झालीय. त्याला कारण म्हणजे टीम इंडियाला मिळालेला मोठा संकटमोचक.
नवी दिल्लीः कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडची दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबतची चिंता आता दूर झालीय. त्याला कारण म्हणजे टीम इंडियाला मिळालेला मोठा संकटमोचक. त्याने सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये धडाकेबाज फलंदाजी करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडसह मध्य प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरची विशेष चर्चा आहे.
टी 20 तून पदार्पण
ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर या दोन्ही खेळाडूंनी टी 20 तून पदार्पण केले आहे. पण दोघांनाही अजून टीम इंडियाकडून एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र, सध्या ते ज्या पद्धतीने विजय हजारे ट्रॉफीत खेळत आहेत, त्यानुसार आगामी दक्षिण आफ्रिकेतल्या एकदिवसीय मालिकेतील निवडीसाठी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे निवड समितीला अवघड ठरणार आहे. त्यातही विशेषतः व्यंकटेश अय्यरबाबत. कारण सध्या जखमी असल्यामुळे हार्दीक पंड्या भारतीय संघातून बाहेर आहे. त्याच्या गैरहजेरीत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाजू सांभाळणारा अष्टपैलू सध्या तरी संघाकडे नाही. ही उणीव व्यंकटेश अय्यरच्या निवडीमुळे सहज भरून निघू शकते. सध्या तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये सातत्याने चांगला खेळत आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडची चिंता जरूर कमी झाली असेल, यात शंका नाही.
चंदीगढविरोधात 151 धावांची खेळी
व्यंकटेश अय्यरने रविवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये चंदीगढविरोधात जोरदार खेळी करत 151 धावा केल्या. विशेष म्हणजे संघ संकटात असताना त्याने ही खेळी केली. मध्य प्रदेश संघाचे 13.4 षटकामध्ये फक्त 56 धावा झाल्या होत्या. त्यात 4 गडी तंबुत परतले होते. अशा वेळी 6 व्या क्रमांकावर आलेल्या अय्यरने एक बाजू सांभाळून धरत मैदानावर धावांचा पाऊस पाडला. त्याने 87 चेंडूमध्ये 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने आपली शतकी खेळी पूर्ण केली. 113 चेंडूमध्ये 151 धावा करून तो बाद झाला. या सामन्यात त्याने 8 चौकार आणि 10 उत्तुंग षटकार खेचले. त्याच्या या तडाखेबंद खेळीमुळे मध्य प्रदेशने चंदीगढसमोर 331 धावांचा डोंगर उभा केला.
व्यंकटेशचे 2 शतक, 1 अर्धशतक
विजय हजारे ट्रॉफीमध्ये व्यंकटेशने चौथ्या सामन्यात हे 2 रे शतक ठोकले आहे. यापूर्वी त्याने 9 डिसेंबर रोजी 84 चेंडूमध्ये 112 धावांची खेळी केली. या सामन्यात तो चौथ्या स्थानी मैदानात उतरला होता. फलंदाजी सोबतच त्याने चांगली गोलंदाजी करत 3 गड्यांना तंबूत धाडले होते. एका तऱ्हेने एका संकटमोचकाची भूमिका त्याने उत्तमरित्या निभावली. या सामन्याच्या एकदिवस अगोदर उत्तराखंडविरोधात खेळताना त्याने तडाखेबंद 71 धावा केल्या. सोबतच 2 गड्यांना बाद केले. येथेही त्याने अष्टपैलू खेळी केली. आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने 4 सामन्यात 139 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 348 धावा केल्या आहेत. त्यात 2 शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
इतर बातम्याः
Sharad Pawar | सहकुटुंब, सहपरिवार…भावुक झालेल्या पवारांनी सांगितलं 12 डिसेंबरचं मायाळू नातं…!