Rohit Sharma-Virat Kohli : फक्त 3 चान्स..रोहित-विराटची अग्निपरीक्षा, वर्ल्ड कपच्या टीममध्ये स्थान हवं तर इथे करुन दाखवा
Rohit Sharma-Virat Kohli : क्रिकेटमध्ये अंतिम सत्य हे आहे की, या खेळात तुमचा भूतकाळ नाही, तर वर्तमान पाहिला जातो. पुढच्या महिन्यात होणारी तीन सामन्यांची वनडे सीरीज या दोन खेळाडूंच्या वर्तमान आणि भविष्यावर मोठा परिणाम करु शकते.

भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं एक वेगळं स्थान आहे. दोघांनी भारतीय क्रिकेटमध्ये अमूल्य योगदान दिलं आहे. भारतासाठी अनेक मॅच विनिंग इनिंग दोघांनी खेळल्या. विराट, रोहित टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व करत असताना भारताने वर्ल्ड कप, कसोटी मालिका, आशिया कप सारख्या टुर्नामेंट जिंकल्या. जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. अनेक रेकॉर्ड मोडले. हरलेले सामने जिंकले. पण क्रिकेटमध्ये अंतिम सत्य हे आहे की, या खेळात तुमचा भूतकाळ नाही, तर वर्तमान पाहिला जातो. पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये होणारी तीन सामन्यांची वनडे सीरीज या दोन खेळाडूंच्या वर्तमान आणि भविष्यावर मोठा परिणाम करु शकते.
मागच्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा या मालिकेत 2-1 ने पराभव झाला होता. त्या सीरीजमध्ये पहिल्या दोन सामन्यात विराट कोहली शुन्यावर आऊट झाला होता. पण सिडनी वनडेमध्ये 74 धावांची खेळी करुन त्याने टीकाकारांना उत्तर दिलं होतं. रोहित या सीरीजमध्ये 8, 73 आणि 121 धावांची इनिंग खेळला. पण टीम इंडियाला मालिका जिंकता आली नव्हती.
फलंदाजांचा कस लागतो
भारतात वनडे क्रिकेटसाठीच्या खेळपट्टया फलंदाजांसाठी स्वर्गासमान असतात. छोटी बाऊंड्री, सपाट विकेट आणि वेगवान आउटफिल्ड. पण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या खेळपट्ट्या यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात. तिथे चेंडूला हवेत आणि पीच दोन्ही ठिकाणी मदत मिळते. उसळी जास्त असते. चेंडू स्विंग होत असल्याने फलंदाजांचा कस लागतो.
तिथे धावा बनवणं भारतासारखं सोपं नाही
भारत यावर्षी मायदेशात वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि त्यानंतर जानेवारी महिन्यात झिम्बाब्वे विरुद्ध वनडे सीरीज खेळणार आहे. रोहित आणि विराट या मालिकांमध्ये दमदार खेळतीलच. पण निवडकर्ते आणि टीकाकारांची नजर इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिणआफ्रिकेतील त्यांच्या परफॉर्मन्सवर असेल. कारण तिथे धावा बनवणं भारतासारखं सोपं नाही.
महान खेळाडूंच्या आयुष्यात काही सीरीज ट्रॉफीपेक्षा मोठ्या असतात
पुढच्या महिन्यात इंग्लंड विरुद्धची सीरीज नुसती द्विपक्षीय मालिका नाही, तर या दोघांसाठी अग्निपरीक्षा असेल. भारतीय क्रिकेटमध्ये दोघांनी खूप योगदान दिलं आहे.रोहित शर्मा आणि विराट कोहलीची बॅट बोलली, त्यांनी भारताला मालिका जिंकवून दिली तर 2027 वनडे वर्ल्ड कपच्या टीममध्ये त्यांच्या समावेशाचा मार्ग बऱ्याच प्रमाणात मोकळा होऊ शकतो. महान खेळाडूंच्या आयुष्यात काही सीरीज ट्रॉफीपेक्षा मोठ्या असतात. इंग्लंड दौरा त्यापैकीच एक आहे.
