मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता विरोध वाढताना दिसतोय. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही विरोध केलाय. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना दौऱ्याला विरोध करणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौऱ्याला आता विरोध वाढताना दिसतोय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी मनसेनंही दंड थोपटले आहेत. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध करण्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं पाणी पुरवठा योजनेत औरंगाबादकरांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेनं केलाय. मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे आणि सुमित खांबेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.