देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. या कटात पकडला गेलेला एक अतिरेकी हा मुंबईच्या धारावी येथे राहणारा होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कामगिरी केली आहे. दहशतवाद्यांचा मुंबईतील लोकल आणि गर्दीच्या ठिकाणी मोठा घातपात घडवण्याचा कट होता, अशी माहिती समोर येत आहे. पण एवढ्या मोठ्या कटाची माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला कशी मिळाली नाही? असा सवाल काहीजणांकडून उपस्थित केला जातोय. त्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी आपली भूमिका मांडली. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अगरवाल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
“काल तुम्ही दिल्ली पोलिसांचा पत्रकार परिषद बघितली. त्यामध्ये दिल्ली पोलिसांनी सहा लोकांना अटक केली आहे. त्यापैकी एक हा मुंबईच्या धारावीतला आहे. त्याचं नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असं आहे. त्याचं पाकिस्तानातील डी कंपनीसोबत संबंध असल्याबद्दलचे अनेक रेकॉर्ड आहेत. जवळपास २० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे. आमच्या नजरेत तो होताच. पण दहशतवाद्याच्या कटबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती. ती सेंट्रल एजन्सीकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना दिली गेली होती”, असं विनीत अगरवाल यांनी सांगितलं.
“जान शेखने 9 सप्टेंबरा जाण्याचं नियोजित केलं. त्याने 10 तारखेला पैसे ट्रान्सफर केले. त्याचं तिकीट कनफॉर्म होत नव्हतं. तर त्याने 13 तारखेचं वेटिंग लिस्ट सहामध्ये नाव नोंद करत तिकीट घेतलं. गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनचं त्याने तिकीट घेतलं. त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याचं तिकीट कन्फर्म झालं. तो मुंबई सेंट्रलहून एकटा निजामुद्दीमच्या दिशेला रवाना झाला. प्रवासादरम्यान तो कोटा येथे जेव्हा पोहोचला तेव्हा त्याला अटक करण्यात आलं. त्याच्याजवळ हत्यारं किंवा स्फोटकं मिळाली नाही. याबाबतची सर्व माहिती दिल्ली पोलिसांकडे आहे. आमची एक टीम आज संध्याकाळी जाणार आहे. दिल्ली पोलिसांकडे असणारी माहिती घेऊन येणार. तसेच आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही दिल्ली पोलिसांना देऊ. त्यानंतर ही केस पुढे कशी जातेय ते बघू”, अशी माहिती विनीत अगरवाल यांनी दिली.