केरळमध्ये ओनम उत्सवामध्ये 30 ते 35 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली होती. केरळचा अनुभव पाहाता आपल्याला सावध होणे आणि काळजी घेणे गरजेचे आहे, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. केंद्रानं ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या अधिक प्रमाणात आहे, तिथं नाईट कर्फ्यू लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयानं नाईट कर्फ्यू आणि इतर सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी राज्य सरकार नक्कीच करेल.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या संदर्भात निर्णय घेतील, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्र आणि केरळ सरकारला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण मोहीम, कोविड सुसंगत वर्तणूक याचं पालन करण्यास सांगितलं आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोनासंसर्गाचा दर आहे तिथं नाईट कर्फ्यू लावावा, असं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.