अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर जगातील विविध देशांनी तिथे असणारे आपले नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केलीय. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात केल्यानंतर भारत सरकारने तेथून भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात परत आणण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे विमान 120 भारतीयांना घेऊन गुजरातच्या जामनगर येथे उतरलं. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने उड्डाण केलं होतं.
भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानातून 120 भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान आज सकाळी भारताकडे रवाना झाले होते. गुजरातमधील जामनगर विमानतळावर हे विमान उतरलं. मायदेशी परत आणले गेलेले सर्व अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत कार्यालयाचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी होते. याशिवाय भारतीय पत्रकारांना देखील माघारी करण्यात आलं आहे. गुजरातच्या जामनगर येथे या विमानातून मायदेशी परतलेल्या नागरिकांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.