उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर निशाणा साधलाय. आम्ही कधी पाठीत खंजीर खुपसला आणि तलवार खुपसली, असं म्हणत नाही. नाना पटोले यांचं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. यासोबत नाना पटोले यांच्या राजकीय पक्षांतराचा इतिहासही अजित पवारांनी सांगत नाना पटोले यांना आरसा दाखवलाय. त्यामुळे कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसली? यावरुन आता राजकीय चर्चांना उधाण आलंय. नाना पटोले आधी काँग्रेसमध्ये होते, मग भाजपमध्ये गेले त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे झाकली मूठ सव्वालाखाची असते, ती प्रत्येकानं झाकून ठेवावी, असा सल्ला अजित पवारांनी नाना पटोले यांना यावेळी दिलाय. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.