मुंलुंडची घटना अपघात नाही, प्रशासनाने केलेला खून; अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत
मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुलुंडमधील मेट्रो स्लॅब कोसळून झालेल्या मृत्यूला प्रशासनाने केलेला खून म्हटले आहे. निकृष्ट काम आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत, त्यांनी "म्युझिकल नखरे" थांबवून लोकांना सुरक्षित आयुष्य देण्याची मागणी केली. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुलुंड येथील मेट्रोचा स्लॅब कोसळून निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही दुर्घटना केवळ एक अपघात नसून प्रशासनाने केलेला खून असल्याची खळबळजनक भूमिका त्यांनी मांडली आहे. ठाकरे यांच्या मते, निकृष्ट दर्जाचे काम, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेला जुगाड आणि प्रशासनाचे वारंवार ताकीद देऊनही झालेले दुर्लक्ष यास जबाबदार आहे.
अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, सरकार गाणी वाजवणारे रस्ते बनवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे. लोकांना गाणी गाणारे रस्ते नको आहेत, तर दर्जेदार रस्ते हवेत. मुंबईकर तुमच्या म्युझिकल इनोव्हेटिव्ह स्टंटसाठी कर भरत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने हे म्युझिकल नखरे थांबवून लोकांना सुरक्षित आयुष्य देण्याची मूलभूत मागणी पूर्ण करावी, अशी त्यांची मागणी आहे. जनतेच्या जीवाशी खेळ थांबवा, असे आवाहनही त्यांनी केले. या घटनेनंतर प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
