मुंबई : राज्यात सत्ता काबीज केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकाकडे भाजपने आपले लक्ष वळवले आहे. राज्याच्या सत्तेतून महाविकास आघाडी सरकारला आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता भाजपची खेळी मुंबई महानगरपालिकेत कमळ फुलवण्याची आहे. त्यानुसार नवनियुक्त अध्यक्ष भाजप नेते आशिष शेलार कामाला लागले आहेत. तसेच आशिष शेलार यांना पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीचं टार्गेट दिल्याचंह समोर आलं आहे. पक्षश्रेष्ठींनी टार्गेट देताना शेलार यांच्यासमोर 150 नगरसेवक निवडणूक आणण्याचे आव्हान दिले आहे. तसेच हे टार्गेट जे.पी.नड्डा यांच्या भेटीत दिल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत नक्की काय होणार याकडे आता मुंबईसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.