खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांनी धडाधड राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांनी आज या नाराज समर्थकांची वरळी येथील निवासस्थानी बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत त्या काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. असे असतानाच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पंकजा मुंडे यांना भाजपाने मुद्दाम डावलंल असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्यावर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच महाविकास आघाडीबद्दल बोलताना मविआमध्ये आपआपसांत कोणतेही वाद नसल्याची प्रतिक्रियाही अशोक चव्हाण यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्षात सामंजस्याने काम सुरु असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले.