Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी सध्या गंभीर संकटात सापडले आहेत. सुरुवातीपासून पावसाची अनियमितता, त्यानंतर खोडकिडा आणि तुडतुडा यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव, तसेच खते आणि कीटकनाशकांच्या वाढत्या किमती यामुळे शेती न परवडणारी झाली आहे. शासनाकडून मिळणारा बोनसही अद्याप मिळालेला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत.
भंडारा जिल्ह्यातील आल्लुर येथील शेतकरी तुकडोजी पोडके यांनी सध्याच्या शेतीच्या गंभीर स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच शेतीत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने पिकांच्या लागवडीसाठी प्रचंड मेहनत करावी लागली. उसणे-वारी पाणी घेऊन पीक जगवण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर पाऊस कमी आल्याने लागवडही योग्य प्रकारे होऊ शकली नाही.
सध्या शेतीमध्ये तुडतुळा, मावा आणि खोडकिळा यांसारख्या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे, ज्यामुळे पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. खतांचे गगनाला भिडलेले भाव आणि महागडी कीटकनाशके यामुळे गरीब शेतकऱ्याला फवारणी करणे परवडत नाहीये. सरकारने घोषित केलेला बोनस अजूनही मिळालेला नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्यांच्याजवळ उपजीविकेसाठी एकही पैसा उरलेला नाही. शासनाने तात्काळ बोनस देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
