बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुढच्या दोन दिवसात भाजपसोबत आघाडी तोडण्याची घोषणा करु शकतात.लालू प्रसाद यांची आरजेडी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली वाढू शकतात. आरसीपी सिंह यांचा वापर करून पार्टीत फूट पाडल्याचा आरोप जेडीयूकडून करण्यात आला आहे.आरपीसी सिंह मोदी सरकारमध्ये मंत्री होते, मात्र राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यावर त्यांचे तिकीट कापण्यात आले. त्यामुळे खासदारकी न मिळाल्यानं आरपीसी सिंहांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आरपीसी सिंहांवर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचेही आरोप लावण्यात आले आहेत, त्यामुळे नितीश कुमारांकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. आरपीसी सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने त्यांनी जेडीयूतून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आरपीसी सिंह यांच्या संपर्कात जेडीयूचे आमदार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढच्या घडामोडी घडण्याआधीच स्वतः नितीश कुमारच भाजपशी संबंध तोडू शकतात अशी दाट शक्यता आहे.