रस्ते अपघातातत जीव गमावणाऱ्यांना भारत देश जगात सगळ्यात पुढे असल्याचं गडकरींनी राज्यसभेत म्हटलंय. यावेळी त्यांनी रस्ते अपघात आणि अपघातातील मृत्यू रोखण्याबाबत सरकार गंभीर असून यावर सातत्यानं काम होत असल्याचं म्हटलंय. दरम्यान, युद्धामुळे किंवा कोविडपेक्षाही सर्वात जास्त मृत्यू जर कोणत्या कारणामुळे देशात झाले असतील, तर ते रस्ते अपघातामुळे झाले आहेत, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. केंद्रीय महामार्ग मंत्री असलेल्या नितीन गडकरींनी यावेळी सविस्तर आकडेवारी सभागृहात सांगितली. कोविडच्या लॉकडाऊन काळातही रस्ते अपघातातील मृतांची आकडेवारी ही दुर्भाग्यपूर्ण असल्याचं त्यांनी म्हटलंय. दोनपेक्षा जास्त वेळा एकाच ठिकाणी अपघात झाला, तर त्या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट घोषित केलं जात आहे. याबाबतचे अधिकारही स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. देशातील राष्ट्रीय महामार्गांवर तब्बल पावणे चार हजार ब्लॅक स्पॉट असल्याचं नितीन गडकरींनी म्हटलंय. यात सातत्यानं वाढ होत असल्यानं चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.