Devendra Fadnavis Speech | ड्रग्ज म्हणजे छुपं युद्ध! मुंबई ड्रग्जमुक्त करणारच! मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुंबईला ड्रग्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्रशासनाने एकत्र येत या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 'ड्रग्ज फ्री मुंबई' शपथग्रहण कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नशामुक्त भारत' संकल्पाचा उल्लेख करत, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुंबईला ड्रग्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्रशासनाने एकत्र येत या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ शपथग्रहण कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नशामुक्त भारत’ संकल्पाचा उल्लेख करत, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले की, भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात देशाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी मोहिम राबवणारा भारत हा अमेरिकेनंतरचा महत्त्वाचा देश ठरला असून, ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या कारवायांमधूनही भारताची ताकद जगासमोर सिद्ध झाली आहे.
यावेळी त्यांनी ड्रग्जच्या वाढत्या विळख्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. भारताला थेट युद्धात हरवणे शक्य नसल्याने देशातील तरुण पिढीला व्यसनाधीन करून भारताला आतून कमकुवत करण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ड्रग्ज हे या छुप्या युद्धातील सर्वात मोठे शस्त्र असल्याचे सांगत, काही स्वार्थी शक्ती पैशासाठी या साखळीत सहभागी झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
ड्रग्जविरोधातील लढा केवळ पोलिसांचा नसून संपूर्ण समाजाचा असल्याचे सांगत, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध शासकीय विभागांनी संयुक्तपणे काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. विद्यार्थ्यांनी “नो ड्रग्स”चा निर्धार केला, तर ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची हिंमतच होणार नाही, असे ते म्हणाले.
शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ड्रग्ज उत्पादन आणि पुरवठ्याच्या साखळीवरही कठोर कारवाई केली जाईल. पुढील दोन ते तीन वर्षांत मुंबई आणि महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना स्वतः पत्र लिहिणार असून, व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गोपनीय माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करणार आहेत. अशा विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी त्यांनी तरुणांना थेट संदेश देत सांगितले की, “21 ते 22 वर्षांच्या वयापर्यंत व्यसनापासून दूर राहिलात, तर आयुष्यभर त्या मार्गावर जाण्याची शक्यता कमी होते. कोणीही ड्रग्जची ‘मजा’ सांगत असेल, तर त्याला सांगा – ही मजा नाही, ही शिक्षा आहे.” शेवटी, ड्रग्जमुक्त समाज घडवण्यासाठी घेतलेली शपथ ही केवळ औपचारिकता नसून ती प्रत्येकाने प्रामाणिकपणे पाळण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
