मुंबई: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीने अटक केली आहे. आता खडसे आणि त्यांच्या कन्येची ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने खडसेंना अडकवत आहेत. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. (ED action on Eknath Khadse its a misuse of Central Agencies : Jayant Patil)
एकनाथ खडसे यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात आहे, असा आरोप करतानाच खडसे यांच्यावर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात अद्याप तथ्य आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, आज सकाळी खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं खडसे म्हणाले.
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.
संबंधित बातम्या:
“जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता”
भोसरी जमीन घोटाळा, एकनाथ खडसेंना मोठा दणका, जावई गिरीश चौधरींना ईडीची अटक
एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींचा ईडी कोठडीत मुक्काम वाढला
(ED action on Eknath Khadse its a misuse of Central Agencies : Jayant Patil)