मुंबई: उत्तर प्रदेशसह चार राज्यात विराट विजय मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मुंबई महापालिकेच्या (bmc) निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. कोणत्याही लढाईने होरपळून जाऊ नका. विजयाने हुरळून जायचं नाही, विजयाने नम्र व्हायचं आहे. विजयाने अधिक मेहनत करायची आहे. अभी तो असली लढाई मुंबई में होगी. आम्हाला मुंबईला कोणत्याही पक्षापासून मुक्त करायचे नाही. आम्हाला मुंबईला (mumbai) भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. जोपर्यंत भ्रष्टाचाराच्या विळख्यातून या मुंबईला बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही. म्हणून हा विजय आज साजरा करा. उद्यापासून कामाला लागा. पुन्हा एकदा मुंबईत प्रचंड विजय आणि भाजपचं महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं सरकार बनविण्यासाठी सज्ज व्हा, असे आदेशच देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले.