हवामान खात्याने इशारा दिल्याप्रमाणे मुंबई आणि रायगड परिसरात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत रात्रीपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत. शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे.
तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील 103 दरडग्रस्त गावांना धोका असल्याने स्थानिक प्रशासनाला नागरिकांच्या स्थलांतरांचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना नदी, समुद्र आणि धरण परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.