Shaktipeeth Expressway च्या भूसंपादनाला मंजुरी अन् 20 हजार कोटींची तरतूद, कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार शक्तीपीठ महामार्ग?
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. भूसंपादनासाठी 20 हजार कोटींच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे. प्रकाश आबिटकर आणि हसन मुश्रीफ यांनी मात्र कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. शक्तिपीठ महामार्गाला होणाऱ्या विरोधावरून ही नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून कळतं.
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी 20 हजार कोटींची तरतूद होणार आहे. शक्तिपीठ महामार्गा साठी विधानसभा निवडणुकीआधी भूसंपादन थांबवलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग, पंढरपूर आणि आंबेजोगाईसह 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग आहे. प्रकाश आबिटकर आणि हसन मुश्रीफ यांची कॅबिनेटमध्ये नाराजी दिसून आल्याची सूत्रांची माहिती आहे. शक्तिपीठ महामार्गाला होणाऱ्या विरोधावरून नाराजी व्यक्त करण्यात आली असून स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचं मत असल्याची सूत्रांची माहिती आहे. 12 जिल्ह्यातील 27 हजार 500 एकराची जमीन हस्तांतरित होणार आहे. तर जमीन जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी आक्रमक झाले आहेत.
12 जिल्ह्यांमधून शक्तिपीठ महामार्ग जाणार
वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग मधून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग परळीतील वैजनाथ, औंधा नानाथ, माहूरची रेणुकादेवी, आई तुळजाभवानी, पंढरपूरमधील विठ्ठल रूखुमाई मंदिर, कोल्हापुरातील म्हाळक्ष्मी मंदिर, सोलापूरमधील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा, नृसिंहवाडी आणि औदुंबर अशा तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे.
