Satara | कण्हेर डाव्या कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
सातारा जिल्ह्यातील वाडेगाव आणि पाटकर गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या कण्हेर डाव्या कालव्याला मध्यरात्रीच्या सुमारास मोठे भगदाड पडल्याची गंभीर घटना घडली आहे. या भगदाडामुळे कालव्यातील लाखो लिटर पाणी अचानक आजूबाजूच्या शेतांमध्ये घुसल्याने परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः ऊस, आणि इतर पिके पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहेत.
सातारा जिल्ह्यातील वाडेगाव आणि पाटकर गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या कण्हेर डाव्या कालव्याला मध्यरात्रीच्या सुमारास मोठे भगदाड पडल्याची गंभीर घटना घडली आहे. या भगदाडामुळे कालव्यातील लाखो लिटर पाणी अचानक आजूबाजूच्या शेतांमध्ये घुसल्याने परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः ऊस, आणि इतर पिके पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहेत. या कालव्याची दुरवस्था अनेक दिवसांपासून सुरू होती. कालव्याला गळती लागणे, भेगा पडणे तसेच पाण्याचा अनियंत्रित प्रवाह याबाबत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित प्रशासन व पाटबंधारे विभागाला लेखी आणि तोंडी स्वरूपात सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. योग्य वेळी दुरुस्ती झाली असती तर हा मोठा अनर्थ टळू शकला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या घटनेमुळे अनेक शेतकऱ्यांची उभी पिके पूर्णपणे नष्ट झाली असून काही ठिकाणी शेतातील मातीही वाहून गेली आहे. घटनेची माहिती मिळताच सकाळी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. कालव्याला पडलेले भगदाड पाहून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत दोषींवर तात्काळ कारवाई करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामा करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
