राज्यातील सत्तांतरानंतर जनतेच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले जाणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलं होतं. त्यानंतर राज्याचे पावसाळी अधिवेशन देखिल आता पार पडले. त्यामध्ये आपण राज्याचे प्रश्न मार्गी लावू, राज्याचा विकास करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यानंतर आता मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत मालमत्ता असलेल्या मालमत्ताधारकांना राज्यशासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मुंबईत पुढील वर्षभर मालमत्ता करात वाढ होणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दर पाच वर्षांनी मालमत्ता करात वाढ केली जाते. २०२० मध्ये मालमत्ता करात वाढ करणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत ही कर वाढ झाली नव्हती. त्यानंतर मात्र पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर करात वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्याला विरोध झाल्याने तो मागे घेण्यात आला होता.