Nasrapur Case | फास्टट्रॅक म्हणजे नेमकं काय? सरकारने व्याख्या सांगावी; नसरापूर प्रकरणावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात साडेतीन ते चार वर्षांच्या चिमुरड्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 1 मे रोजी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात साडेतीन ते चार वर्षांच्या चिमुरड्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 1 मे रोजी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून या घटनेचा निषेध करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “सरकारने कायदा काय सांगतो किंवा कोण काय म्हणेल याचा विचार न करता आरोपीला कठोर शिक्षा करावी,” असे मत त्यांनी व्यक्त केले. राज ठाकरे यांनी सरकारच्या ‘फास्टट्रॅक’ कारवाईच्या घोषणांवरही प्रश्न उपस्थित केला. “फास्टट्रॅक म्हणजे नेमकं किती वेळेत न्याय मिळणार, याची स्पष्ट व्याख्या सरकारने करावी,” असे ते म्हणाले. राज्यात महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर लाठीचार्ज झाल्याच्या बातम्यांवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “आंदोलकांवर कारवाई करण्याइतकी तत्परता सरकार गुन्हेगारांविरोधात का दाखवत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पीडितेला न्याय मिळावा यासाठी विविध स्तरांतून मागणी होत आहे.
