सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, ‘वातावरण खराब होऊ नये…
प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांच्या प्रस्तावित मुंबई आंदोलनावर चिंता व्यक्त केली आहे. सणासुदीच्या दिवसात आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले. सण उत्साहात साजरे केले जावेत, लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत आणि मुंबई पोलिसांवरील ताण लक्षात घेण्याची त्यांनी आंदोलकांना विनंती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर राखत सणांना व्यत्यय येऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत प्रस्तावित केलेल्या आंदोलनावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. जरांगे पाटील यांनी ५,००० लोकांसह आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मागितली असून, दरेकर यांनी सणासुदीच्या दिवसांमध्ये अशा आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली. दरेकर म्हणाले की, सणासुदीचे दिवस आहेत आणि लोकं सण-उत्सव उत्साहात साजरे करण्यात गुंतलेले असतात.
मिरवणुका व रस्त्यावर वर्दळ असते. अशा काळात आंदोलन करणे योग्य नाही. मुंबई पोलिसांवर गणेशोत्सव आणि अन्य सणांच्या काळात मोठा ताण असतो, हे आंदोलकांनी लक्षात घ्यावे. तेही माणसे आहेत आणि त्यांच्यावर सुरक्षेच्या दृष्टीने मर्यादा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक म्हणून हिंदूंचे सण, उत्सव आणि परंपरा यांना व्यत्यय येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन दरेकर यांनी केले. कुठल्याही सणांवर बालंट येऊ नये आणि सणासुदीला वातावरण खराब होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
