अहमदनगर : शिर्डी लोकसभा निवडणूक मी एकदा पडलो असलो तरी पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज आहे. आता मी यावेळी पडणार नाही. असे सांगत कार्यकर्त्यांना एकजुटीने आरपीआय पक्ष वाढवण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन करत असताना काही कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्यात. यावेळी रामदास आठवले काहीसे भडकले आणि त्या कार्यकर्त्याला घोषणा बंद करून शांत राहण्यास सांगितले. ते खोचकपणे असेही म्हणाले की, अशा लोकांमुळे पार्टीचा सत्यानाश झालाय. दरम्यान, येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा दावाही त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकार वज्रमूठ बांधण्याच भासवत आहे. पण त्यासर्वांची लूट करण्याचे काम केले आहे. असे असले तरी भाजप सरकार त्यांच्या वज्रमूठीला घाबरत नाही. तर 32 राज्यात आरपीआयचे काम असून महाराष्ट्रात या पक्षाची मोठी ताकद आहे. आरपीआय पक्ष ज्या पक्षासोबत राहतो त्या पक्षाची सत्ता देशात येते असेही ते म्हणाले.