मोहोर आलेल्या आंब्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव! शेतकरी संकटात

| Updated on: Feb 25, 2026 | 11:34 AM

कोकणातील बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याचा मोहोर काळा पडला असून, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पहिल्या टप्प्यातील मोहोर वाया गेल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मोहोरही खराब झाल्याने आंबा बागायतदार चिंतेत आहेत. वारंवार फवारण्या करूनही नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

कोकणातील बदलत्या हवामानामुळे यंदाच्या हंगामात हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. गेल्या आठवड्याभरापासून धुकं, जास्त उष्णता आणि अवकाळी पाऊस अशा वातावरणाचा परिणाम थेट आंबा मोहोरावर दिसून येत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातील आंबा बागांमध्ये मोहोरावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोहोर काळा पडला आहे.

सध्या नाचणे भागातील एका आंबा बागेमध्ये मोहोरावर कीटकनाशकाची फवारणी सुरू असल्याचे दिसून आले. पहिल्या टप्प्यात मोहोर आला नाही आणि आता दुसऱ्या टप्प्यात आलेला मोहोरही काळा पडल्याने आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकरी सहाव्यांदा फवारणी करत असूनही मोहोर वाचत नसल्याचे सांगत आहेत. महागड्या औषधांमुळे आणि आंब्याचे उत्पादन घटल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ही परिस्थिती कोकणातील आंब्यासाठी गंभीर धोका निर्माण करत आहे.

Published on: Feb 25, 2026 11:34 AM