Sachin Ahir: मंत्रालयाचा कारभार सध्या सचिवांच्या स्वाधीन केल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांचा टीकेचा भडीमार सुरु आहे. याला मंत्रालय म्हणायचं की सचिवालय असा टोला शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी लगावला आहे. मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याने शिवसेना नेते सचिन अहिर यांनी सरकारवर टीका केली. अनेक जी आर निघूनही मंत्री नसल्याने त्यावर अंबलबजावणी होऊ शकत नाही. तसेच अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असून गुन्हेगारांवर अंकुश राहिलेला नाही असे अहिर म्हणाले. दिल्लीच्या वाऱ्या होऊनही मंत्रिमंडळाचा खोळंबा होत असल्याने यात सामान्य माणसाला वाऱ्यावर ठेवले जात असल्याचा आरोप यावेळी आमदार अहिर यांनी केला. तातडीने मंत्रिमंडळ विस्तार होणार नसेल तर सरकारने जनतेला तसं स्पष्ट सांगावे की, आम्ही दोघेच सरकार चालवू, असा टोलाही अहिर यांनी मारला.