Sanjay Raut : शिंदे सेनेचा कोथळा अमित शहाच काढणार, गुलाबो गँग म्हणत राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट, कुणावर साधला निशाणा?
उपचार घेत असतानाही संजय राऊत यांनी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. त्यांनी सध्या सुरू असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये पैशांचा अभूतपूर्व वापर होत असल्याचा आरोप केला. निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त झाल्याचे सांगत, त्यांनी शिंदे गटावर गंभीर टीका करत अमित शाह यांच्याबद्दल मोठे विधान केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी त्यांच्या आरोग्य स्थितीबद्दल माहिती देतानाच राज्यातील राजकारणावर जोरदार हल्ला चढवला आहे. “माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही” असे म्हणत त्यांनी सध्या सुरू असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचा आरोप केला.
राऊत यांच्या माहितीनुसार, त्यांची तब्येत सुधारत असून रेडिएशनचा मुख्य टप्पा पूर्ण झाला आहे. डिसेंबरपर्यंत पूर्ण बरा होण्याची त्यांना खात्री आहे. या काळात उद्धव ठाकरे यांचे त्यांच्यावर बारीक लक्ष आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्तेतील तीन पक्षांकडून पाच-पाच, सहा-सहा हेलिकॉप्टर्स आणि खाजगी विमानांचा वापर केला जात असल्याचा दावा राऊत यांनी केला. एका नगरपालिकेसाठी १५ ते २० कोटी रुपयांचे बजेट असल्याचे ते म्हणाले.
शिंदे गटाच्या ‘गुलाबो गँग’ने ‘लक्ष्मी दर्शन’ घडवले असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी, अशी मागणी राऊतांनी केली. महाराष्ट्राची निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त झाल्याचे सांगत, गेल्या चार-पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे घडवून आणल्याचा ठपका त्यांनी ठेवला.