Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार… संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
संजय राऊत यांनी राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली आहे. "सरकारमध्ये दिल्लीत जाण्यासाठी स्पर्धा लागल्यात," असे म्हणत त्यांनी दुष्काळाची भीषणता आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. दुष्काळ बैठकीत काजू-बदाम खाण्यावरून त्यांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. सरकारमधील अनेक नेते दिल्लीत जाण्यासाठी स्पर्धा करत असल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती आणि तरुणाईच्या आत्महत्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राऊत म्हणाले की, “सरकारला गांभीर्य असते तर आतापर्यंत दुष्काळ जाहीर केला असता.” मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली. नांदेडमधील दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम खाण्याच्या प्रकारावरून त्यांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवले. आयआयटीमधील विद्यार्थ्यांची आत्महत्या आणि एका मुलीच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या राजकारणावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. कोणताही संशयास्पद मृत्यू असेल तर त्याची चौकशी व्हायलाच हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
