विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद संपण्याची चिन्ह दिसून येत नाहीत. कारण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी आमदारांच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं या नेत्यांनी सांगितलं. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केलीय. संजय राऊत आज खेडमध्ये बोलत होते. राज्यपाल हे पॉलिटिक एजंट असतात. त्यांची नेमणूक ही राजकीय असते. ते तटस्थ असतात का तर अजिबात नाही. राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होते. राज्यपाल हे केंद्रात भाजपचे मंत्री होते. राज्यपाल हे भाजपचे राज्यसभेचे सदस्य होते. राज्यपाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. नक्कीच त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम आणि आदर आहे. सरळमार्गी गृहस्थ आहेत. पण शेवटी ते भाजपला जे हवं आहे तेच करतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांना टोला लगावलाय.