मुंबई: उत्तर प्रदेशसह चार राज्यात भाजपची (bjp) सत्ता आली आहे. त्यामुळे या विजयाचा थेट संबंध मुंबई महापालिकेच्या निवडणुकीशी (bmc) जोडला जात आहे. या चारही राज्यांच्या निवडणुकांचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. उत्तर प्रदेश किंवा या चार राज्यांच्या निवडणुकांचा मुंबई महापालिका निवडणुकीशी काहीही संबंध नाही. गेली 50 वर्ष आम्ही महापालिका लढतोय आणि या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पालिकेवर कायम राहील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी एकीकडे हा दावा केलेला असतानाच दुसरीकडे भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सज्ज व्हा. आजपासूनच कामाला लागा, असे आदेशच फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.